धरण उशाशी आणि कोरड घशाशी; पिंपरीची ऐन पावसाळ्यात अवस्था 

धरण उशाशी आणि कोरड घशाशी; पिंपरीची ऐन पावसाळ्यात अवस्था 

पिंपरी-चिंचवडलापाणीपुरवठा करणारे धरण भरले असले,तरी अनधिकृत बांधकामांमुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्यातून त्यांनी या बांधकामांना चालना देण्यास जबाबदार असलेल्या पुढाऱ्यांनाच अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. दुसरीकडे हे अधिकारीच या प्रश्‍नाला जबाबदार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या आहेत.

पिंपरीः शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरले असले,तरी अनधिकृत बांधकामांमुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्यातून त्यांनी या बांधकामांना चालना देण्यास जबाबदार असलेल्या पुढाऱ्यांनाच अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. दुसरीकडे हे अधिकारीच या प्रश्‍नाला जबाबदार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या आहेत. त्यामुळे आपल्यावरील बालंट दुसऱ्याच्या माथी मारण्याचा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविला असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, याव्दारे पाणीपुरवठा विभागाने पालिकेच्या बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन या दुसऱ्या विभागाची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आणली आहे. यातून पालिका प्रशासनाला घरचा आहेर मिळाला आहे. बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कारवाई करण्यात तसेच त्यांना आळा घालण्यात पालिकेचा एक विभाग (अतिक्रमण) अपयशी ठरला असल्याचेच दुसऱ्या विभागाने (पाणीपुरवठा) स्पष्ट केले आहे. 

उद्योगनगरीला पाणीपुरवठा करणारे पवना धरण यावर्षी भरले आहे. तरीही पावसाळ्यात शहराच्या अनेक भागात पाणी कमी व अपुऱ्या दाबाने मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नगरसेवक हैराण आहेत. पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर हंडामोर्चा काढण्याचा इशारा त्यातून हैराण झालेल्या एका सत्ताधारी महिला नगरसेविकेनेच दिला. परिणामी महापौर राहुल जाधव यांनी काल याप्रश्‍नी पालिका पदाधिकारी, नगरसेवक व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात या अधिकाऱ्यांना नगरसेविकांनी धारेवर धरले. 

बैठकीनंतरही पत्रकारांशी बोलताना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचे खापर शहरातील मोठ्या संख्येने असलेल्या वाढत्या अनधिकृत बांधकामांवर फोडले. त्याचवेळी शहरात 15 हजार अनधिकृत नळजोड असल्याची माहिती देताना अतिक्रमण विभागावर आरोप करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाची अकार्यक्षमतही त्यातून उघडी पडली. हे नळजोड अधिकृत केले,तर पाणीटंचाई जाणवणार नाही, असेही या अधिकाऱ्यांनी महापौरांच्या उपस्थितीत पत्रकारांना सांगितले. शहराच्या चाळीस टक्के भागाला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे अवघे 14 टक्के काम गेल्या दोन वर्षात झाल्याची कबुली त्यांनी दिली. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याची जुनी यंत्रणा कुचकामी ठरल्याचेही त्यांनी सांगितले. दिवसातून चार तास पाणी देण्यात अडचणी असताना शहराला चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना यशस्वी होईल का याचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. 

दरम्यान, रहिवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि तोंडावर आलेला दिवाळसण हे पाहता येत्या आठ दिवसांत पाणीप्रश्‍नावर उतारा काढा, असा आदेश महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com