मराठवाड्यातील स्थलांतरीतांची संख्या रोखण्याची जबाबदारी पार पाडतोय : संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई, पुणे परिसरात औद्योगक वसाहती निर्माण होत असताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्याचा विचारच केला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांवर कामासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली, अशी खंतराज्याचे मराठवाड्यातील मंत्री (कामगारमंत्री) संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यातील स्थलांतरीतांची संख्या रोखण्याची जबाबदारी पार पाडतोय : संभाजी पाटील-निलंगेकर

पिंपरीः मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झालेच नसते, तर मध्य भारताच्या पोटात एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते. हा भारताच्या दृष्टीने मोठा धोका होता. त्यामुळे मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन होणे, ही गोष्ट ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची तर आहेच; शिवाय भारतीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त करून देणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागन्नाथ कोतापल्ले यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये काल (ता.20) केले. 

दरम्यान, मुंबई, पुणे परिसरात औद्योगक वसाहती निर्माण होत असताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्याचा विचारच केला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांवर कामासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली, अशी खंत राज्याचे मराठवाड्यातील मंत्री (कामगारमंत्री) संभाजी पाटील-निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. परंतु, आता रेल्वे कोच निर्माण करण्यासारखे प्रकल्प मराठवाड्यात आणून स्थलांतरीतांची संख्या रोखण्याची जबाबदारी आपण पार पाडीत आहोत, असे ते म्हणाले. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना स्थलांतरीत होण्याची गरज आता भासणार नाही. त्यादृष्टीने सरकार पाऊले टाकत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित 'मराठवाडा भूषण पुरस्कार' वितरण सोहळ्याप्रसंगी ‘मराठवाडा मुक्तीदिन’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. कोतापल्ले व  निलंगेकर बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन निलंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार महेश लांडगे, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कवेकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, संयोजक व ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर आदी मराठवाड्यातील बंधू,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात मराठवाडा संग्रमाची नोंद फारशी घेतली न गेल्याबद्दल डॉ. कोतापल्ले यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, मराठवाडा हा 16 जिल्ह्यांचा मोठा प्रदेश होता. जर मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झालाच नसता, तर मध्य भारताच्या पोटात पुन्हा एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते. हा एक भारतासाठी मोठा धोका होता. म्हणून मराठवाड्यातील लोकांनी लढे उभारले, संघर्ष केला, बलिदान दिले. त्यामुळे मराठवाडा भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिन्याने स्वतंत्र झाला आणि भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त झाला. ‘मराठवाड्याची मुक्तता’ असे म्हणण्यापेक्षा निजाम राज्यातून स्वतंत्र होणे, ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. स्वामी रामानंद तीर्थ, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे अशा अनेकांनी मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे. निजामाच्या तावडीतून हा प्रदेश मुक्त झाला पाहिजे, यासाठी लढा उभारला. त्यांच्यामुळेच मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन होऊ शकला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com