राष्ट्रवादीवरील भाजपच्या आरोपाचे कॉंग्रेसकडून खंडन,तर राष्ट्रवादीकडून मौन

बदनाम झालेल्या व अपयशी ठरलेल्या भाजपकडून आयुक्तांवर आरोप म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’असा प्रकार असल्याची टीका कॉंग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.
राष्ट्रवादीवरील भाजपच्या आरोपाचे कॉंग्रेसकडून खंडन,तर राष्ट्रवादीकडून मौन

पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या दबावाखाली काम करीत असून त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे,असा खळबळजनक आऱोप भाजपच्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी पत्रकारपरिषद घेऊन केला.

'अडवा आणि जिरवा' असे धोरण त्यांनी भाजपबाबत अवलंबले असून ते त्यांनी थांबवले नाही,तर त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढून अविश्वास ठराव आणू,असा इशाराही या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यावर राष्ट्रवादीकडून भाजपवर तीन दिवस उलटूनही अद्याप कसलाही हल्लाबोल झाला नाही. मात्र, कॉंग्रेसने त्याला शनिवारी (ता.१८) प्रत्युत्तर दिले. बदनाम झालेल्या व अपयशी ठरलेल्या भाजपकडून आयुक्तांवर आरोप म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’असा प्रकार असल्याची टीका कॉंग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

तर, 'मी राजकीय व्यक्ती नसल्याने या राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही,' असे आयुक्त पाटील यांनी सांगितले होते. मात्र,मी काय काम केले वा करणार याविषयी बोलेन,असे ते यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांच्या आरोपावर गेले तीन दिवस शहर राष्ट्रवादी चुप्पी साधून आहे. त्यांचे नेते अजित पवारांवर आरोप होऊनही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला नसल्याने त्याची शहरात चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे शनिवारी (ता.१८) कॉंग्रेस, मात्र राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी या आपल्या मित्रपक्ष तसेच आय़ुक्तांच्या मदतीला धावून गेला.

भाजपच्या काही नगरसेवकांनी आपल्याच नेत्यांचे व पालिकेतील भ्रष्टाचाराचे केलेले वस्त्रहरण, ठेकेदारी व टक्केवारीसाठी दोन आमदार व त्यांच्या बगलबच्च्यांमध्ये होत असलेली लूटमार, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लाचप्रकरणी भाजपच्या पदाधिका-याला झालेल्या अटकेमुळे अब्रूचे खोबरे झालेल्या सत्ताधा-यांनी आयुक्तांवर केलेले आरोप हास्यास्पद आहेत. जनतेचे लक्ष या घटनांवरून विचलित करण्यासाठी रचलेले ते षडयंत्र आहे, असा पलटवार डॉ. कदम यांनी केला.

प्रत्यक्षात महापौर व शहरातील भाजप नेत्यांचे आयुक्तांवरील रोषाचे कारण वेगळेच आहे. मात्र त्यावरून रोष व्यक्त करण्याची वेळ चुकल्याने महापौरांच्या टिकेमागील वेगळे कारण उघड झाले आहे, असे ते म्हणाले. मात्र, शहरातील जनता सुज्ञ आहे. त्यांनी भाजपचा गेल्या साडेचार वर्षाचा भ्रष्टाचार पाहिला. शास्तीकराच्या नावाने दिलेली खोटी आश्वासने पाहिली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली ‘डार्क लूट ‘अनुभवली. कोरोना काळात केलेला भ्रष्टाचारही पाहिला. कृत्रिम पाणीटंचाई व टॅंकरराज ही साखळी, शिक्षण मंडळातील बेधुंद व चुकीची खरेदी, एफडीआर घोटाळा, लाचलुचपत विभागाची धाड व रंगेहात पकडलेले पदाधिकारी, पर्यावरणाचे प्रश्न, नद्यांची स्वच्छता, आरोग्यसुविधा, काँक्रिटकरणातील भ्रष्टाचारावर ‘महापौर का बोलत नाही ‘? हा जनतेचा सवाल मी काँग्रेसकडून महापौरांना जाहीरपणे विचारत आहे, असे डॉ. कदम म्हणाले. का यालाही इतर कोणी जबाबदार आहे ? याचे उत्तर महापौरांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीवरील भाजपच्या आरोपाचे कॉंग्रेसकडून खंडन,तर राष्ट्रवादीकडून मौन
अरुंधती रॅाय यांच्या विधानामुळे वाद ; मोदींचे नाव न घेता टीका

कोरोना काळात तीन हजार रूपयांची मदत न देणे व ड्रायविंग स्कूल प्रशिक्षणाबाबत आपण आयुक्तांना जबाबदार धरत असाल, तर बाकीच्या बाबतीतील स्वजबाबदारीचे काय? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे महापौरांनी मनपा कामकाजाचे आत्मपरीक्षण करावे व अपयश मान्य करून पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com