देशातील जनता पुन्हा मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवेल - रावसाहेब दानवे 

''नुकत्याच झालेल्या तीन राज्यात भाजपचा पराभव झाला असला तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशात चांगले काम करते आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवेल," असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
Raosaheb Danve- Narendra Modi
Raosaheb Danve- Narendra Modi

बदनापूर : ''नुकत्याच झालेल्या तीन राज्यात भाजपचा पराभव झाला असला तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशात चांगले काम करते आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवेल," असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

बदनापूर येथे आमदार नारायण कुचे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रामकथा समारोपासाठी रावसाहेब दानवे आले होते. यावेळी आगामी निवडणुका व तीन राज्यातील निकालांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना विचारले असता दानवे म्हणाले, "देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा बहुमत प्राप्त करू. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. अर्थात त्यास तिथले स्थानिक प्रश्न व परिस्थिती जबाबदार आहे. या तिन्ही राज्यात पूर्वी भाजपचे सरकार होते त्यामुळे 'अँटी इन्कन्मबन्सी' फॅक्‍टरचा प्रभाव देखील असू शकतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची कामगिरी अत्यंत चांगली आहे." 

तीन राज्यांच्या निकालाचा परिणाम नाही
"देशात राबविण्यात येत असलेल्या विकासात्मक योजना व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा वाढत असलेला प्रभाव याचे आकलन निश्‍चितच जनता करते आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तीन राज्यात लागलेल्या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. पुन्हा एकदा देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता देत भाजप व मित्रपक्षांना बहुमताने विजयी करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक घेण्याबाबत राज्य सरकारला कुठलीही घाई झालेली नाही. दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्‍यता दिसत नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे भरीव मदत मागण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com