सातारा जिल्ह्यातील पाच मतदारसंघावर भाजपचा हक्क : विक्रम पावसकर

सातारा जिल्ह्यातील पाच मतदारसंघावर भाजपचा हक्क : विक्रम पावसकर

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची सातारा जिल्ह्यात भाजपची प्राथमिक पातळीवरील तयारी झाली आहे. 70 टक्के बुथ बांधणी पूर्ण झाली असून जिल्ह्यात साडेतीन लाख सभासद ऑनलाइन नोंदणी आहे. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र युती झाल्यास जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा असेल, असे स्पष्ट मत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू आहे. आतापर्यंत भाजपने साडेतीन लाख सभासदांची नोंदणी पूर्ण केली आहे, असे सांगून विक्रम पावसकर म्हणाले, बुथ स्तरावर बांधणी 70 टक्के पूर्ण झाली आहे. आता निवडणुकीसाठी शिवसेने सोबत भाजपची युती होईल, अथवा नाही हे सांगता येत नाही. पण युती झाली तर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा राहिल. 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेली मते पाहता यामध्ये वाढच झाली आहे. आता विकास कामांसाठी मोठ्याप्रमाणात निधी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध झाला आहे. दरम्यान, जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलले असून गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना असे करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. 

फुकटचे श्रेय घेऊ नये : दीपक पवार 
ब्रेक टेस्टच्या कामाच्या पहाणीवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आता सगळ्यांनाच आमदार झाल्यासारखे वाटतंय अशी टिका केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना भाजपचे नेते दीपक पवार म्हणाले, त्यांना फुकटच्या कामाचे श्रेय घेण्याची पहिल्यापासून सवयी आहे. ब्रेक टेस्टच्या कामासाठी सर्वाधिक सात निवेदने आमच्या संघटनेने दिली होती. तत्वत: मान्यता मिळाली त्यावेळी दहा लाख रूपये या कामाला मंजूर केले होते. त्यामुळे या कामाचे श्रेय आमचे आहे. कोण आमदारकीचे मुख्यत्यार पत्र घेऊन आलेले नाही. सामान्य घराण्यातील मी मुलगा आहे. त्यामुळे आमदारकीची महत्वाकांक्षा मलाही आहे. फुकटच्या कामाचे श्रेय घेऊन टोमणा मारू नका, असा टोला आमदारांचे नाव न घेता लगावला. 

कोरेगावात आमदार फंडातील कामे बेपत्ता.... 
कऱ्हाड व कोरेगावात पोस्टर बॉय झाले आहेत अशी टीका आमदार शशीकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांच्यावर केली होती त्याबाबत विचारले असता महेश शिंदे म्हणाले, विरोधकांकडे टीका करण्यासाठी मुद्दाच राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी ही टीका सुरू केली आहे. भाजपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात निधी आणून विकास कामे सुरू केली आहेत. त्यामुळे यांची दुकानदारी बंद होणार आहे. कोरेगावात आमदार फंडातून झालेली कामे निकृष्ठ दर्जा झाली असून काही ठिकाणी रस्तेच गायब झाले आहेत. कोडोली, संभाजीनगर येथील 25 लाखांचे रस्ते तीन महिन्यात कुठेच दिसेनासा झाला आहे. पूनर्वसित गावात निकृष्ठ दर्जाची कामे केली असून आमदार फंडातून झालेली कामेच अस्तित्वात नाहीत, असा गौप्यस्फोट केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com