पवारांचे तिकीट पक्के झाले आता पंडित काय करणार ?

सभेला जमलेली गर्दी पाहता आज जरी मतदान झाले तरी भाजप आमदार लक्ष्मण पवार पुन्हा विजयी होतील असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबच केले.
पवारांचे तिकीट पक्के झाले आता पंडित काय करणार ?

बीड : गेवराईची जागा शिवसेनेला सुटून बदामराव पंडित यांना उमेदवारी मिळेल, असे चित्र तत्कालिन समीकरणात निर्माण झाले होते. परंतु, वेळेनुसार राजकीय समीकरणेही बदलली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराईतून भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबच केले. त्यामुळे आता शिवसेनेचे बदामराव पंडित काय करणार, असा प्रश्न आहे. 

दोघांनीही आमदार पवारांचे कौतुक तर केलेच शिवाय आज जरी मतदान झाले तरी पवार विजयी होतील असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे आता बदामराव पंडितांनी काय करायचे, असा प्रश्न आहे. त्यांच्यासमोर मर्यादित पर्याय आहेत. सुरक्षित पर्याय म्हणजे शिवसेना - भाजप युती झाली नाही तर शिवसेनेतर्फे निवडणुकीत उतरायचे. दुसरा पर्याय युती झाली तरी अपक्ष उभारुन निवडणूक लढवायची. आणि तिसरा पर्याय शांत राहून युतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आणि भविष्यात संधी मिळण्याची वाट पाहायची . 

बदामराव पंडित गेवराईतून अपक्ष उभे राहून आमदार झाले होते पण तेंव्हा त्यांना भाजप - शिवसेनेचा पाठिंबा होता. परंतु, त्यावेळी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची ताकद त्यांच्या पाठीमागे होती. पण आता तशी परिस्थिती नाही. बदामराव पंडित यांच्या प्रवेशाने गेवराईत मरगळलेल्या शिवसेनेला जनमत, कार्यकर्त्यांचा संच आणि काही संस्थांवर वर्चस्व असलेल्या संजीवनी मिळाली होती. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेला जिल्हा परिषदेत सभापतीपद आणि गेवराई पंचायत समितीवर शिवसेनेला झेंडा रोवता आला. 

दरम्यान, जिल्हा परिषद सत्तारोहणाच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि बदामराव पंडित यांच्यात राजकीय जवळीकता वाढली होती . तर, याच वेळी भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व पंकजा मुंडेंमध्ये काहीसा दुरावा असल्याने ही जवळीकता अधिकच दृढही झाली होती. दरम्यान, जिल्ह्यात युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेकडे तर उर्वरित पाच जागा भाजपकडे आहेत. त्या काळात जयदत्त क्षीरसागरही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे या सर्व बाबींमुळे पंकजा मुंडेंच्या सहमतीने बीड ऐवजी गेवराईची जागा शिवसेनेला सोडून बदामराव पंडित यांना उमेदवारी मिळेल, असे काहीसे चित्र होते. 

बदामराव पंडितही शिवसेनेपेक्षा भाजपच्याच कार्यक्रमांना अधिक हजेरी लावत होते. तर, पवारांच्या दुराव्यामुळे पंकजा मुंडेंकडूनही बदामराव पंडित यांना बळ दिले जात होते. अगदी लोकसभा निवडणुकीतही बदामराव पंडित यांनी ताकदीने प्रचाराला सुरुवात केली. पण, लोकसभा निवडणुकीपासूनच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर, मुंडे - पवार यांच्यातही समेट झाला. 

त्यामुळे अगोदरच युतीत हक्काची असलेली बीडची जागा जयदत्त क्षीरसागर यांनाच मिळेल असे मानले जात आहे. अगदी त्यासाठीच त्यांनी भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश केलेला असल्याने आणि मंत्रीपद दिल्याने त्यांच्यासाठी जागाही कायम राहणार हे निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे बदामराव पंडित यांना राजकीय वाटचाल आता कोणत्या दिशेने करायची आणि विधानसभेला काय भूमिका घ्यायची हे लवकर ठरवावे लागेल . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com