यात्रेकडे राणा जगजितसिंह, पद्मसिहांनी पाठ फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले राहुल मोटेंना महत्व 

यात्रेकडे राणा जगजितसिंह, पद्मसिहांनी पाठ फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले राहुल मोटेंना महत्व 

उस्मानाबाद :  जिल्ह्यात आज आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेकडे राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह त्यांचे वडील डॉ. पद्‌मसिंह पाटील यांनी देखील पाठ फिरवली . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपले धोरण बदलत राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोठे यांना जिल्ह्याच्या राजकारणात महत्व देण्याचे संकेत दिले आहेत . 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या कठोर टिकेतून देखील हे स्पष्ट झाले आहे. 

बीड जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आहे. तर तिकडे उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले. उस्मानाबादेत राष्ट्रवादी म्हणजे डॉ. पद्‌मसिंह पाटील व पद्‌मसिंह पाटील म्हणजे राष्ट्रवादी असे चित्र होते. डॉ. पाटील यांच्या वाढत्या वयानंतर हेच नेतृत्व राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे आले होते. आजवर राज्यातील जेष्ठ नेते जिल्ह्यात आले की पहिल्यांदा डॉ. पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडेच याचचे. 

आजच्या शिवस्वराज्य यात्रेत मात्र ही प्रथा मोडीत निघाली. राणा जगजितसिंह पाटील यांच्याऐवजी आमदार राहुल मोटे यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व गेल्याचे यावेळी दिसून आले. शिवस्वराज्य यात्रा आली ती थेट आमदार मोटे यांच्या मतदारसंघात. शिवाय सगळ्या राज्यपातळीवरील नेत्यानी आमदार मोटे यांच्याकडेच पाहुणचार घेतला.

त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे मोटे यांच्याकडे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पाटील पिता-पुत्रांना हटवण्यात आले. एवढेच नाही तर मेळाव्यातील भाषणातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या दोघांवर निशाणा साधला. 

फितुरांच्या नादाला लागू नका 
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात जयंत पाटील यांनी राणा जगजितसिंह यांच्यावर अप्रत्क्षपणे टिका करतांना त्यांना फितुराची उपमा दिली. ते म्हणाले, "राष्ट्रवादीच्या सातबा-यावर ज्यांच नाव सुरवातीपासुन आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे या पक्षाच्या नावावर सत्ता भोगली, तेच निष्ठेला तिलाजंली देत पक्षातंराच्या भुमिकेत असतील, तर अशा फितुरांच्या नादाला लागु नका' असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 

या अगोदरची राष्ट्रवादीची निर्धार यात्रा राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने तुळजापुर येथील तुळजाभवानीचे दर्शन घेऊन निघाली होती. त्यानंतर उस्मानाबादेत सभा घेण्यात आली होती, या सभेला अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. पण राणा जगजितसिंह यांच्या अनुपस्थितीनंतर आता राष्ट्रवादीचे सत्ताकेंद्र उस्मानाबाद मतदारसंघाला लागुन असलेल्या वाशीकडे हलले आहे. 

आमदार राहुल मोटे यांच्या मतदारसंघात सभा घेऊन शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी मोटे यांच्यावर सोपवल्याची चर्चा सुरू झाली आहे. आजवर आमदार मोटे यांनीही डॉ.पाटील व नंतर राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे, पण यापुढे राजकीय चित्र बदलणार असल्याचे आजच्या घडामोडीवरुन दिसत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com