जळगाव : संपूर्ण जगभरात कोरोनाचा हाहाःकार सुरु असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारकडून शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. मात्र, खासगी डॉक्टरांकडून ओपीडीसह रुग्णालये बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची चांगलीच हेळसांड होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
संपूर्ण जगात कोरोनामूळे हाहाःकार माजला असून यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका वैद्यकीय अधिकारी पार पाडत आहे. देशभरात कोणत्याच रुग्णाचा वैद्यकीय उपचाराअभावी मृत्यू होवू नये. तसेच प्रत्येकाला उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेला अर्लट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालये देखील सुरु ठेवून रुग्णांवर उपचार करण्याबाबत देखील शासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची तपासणीच गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. यामूळे हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधूमेह या रुग्णांची तपासणी होत नसल्याने या रुग्णांची खासगी डॉक्टरांकडून हेळसांड सुरु असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
शहरात अनेक तज्ञ डॉक्टरांची रुग्णालये असल्याने संपूर्ण जिल्हाभरातून रुग्ण तपासणीसाठी व उपचार घेण्यासाठी शहरात येत असतात. परंतु, खासगी डॉक्टरांसह रुग्णालयांमध्ये ओपीडी बंद ठेवण्यात आली असून उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे चांगलेच हाल होत असल्याने डॉक्टरांच्या या आडमूठे भूमिकेबद्दल समाजात रोष व्यक्त केला जात आहे.
मधूमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार यासह अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना महिनाभरानंतर तपासणीची आवश्यकता असते. त्यांची तपासणी केल्यानंतर त्याच्या नुसार या रुग्णांना नियमीत औषधी दिल्या जात असतात. परंतू गेल्या 20 दिवसांपासून खासगी रुग्णालये बंद असून या ठिकाणी डॉक्टरांकडूनच तपासणी करण्यास मनाई केली जात असल्याने खासगी डॉक्टरांनी रुग्णांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याची प्रतिक्रीया रुग्णांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोना वार्डात दाखल होवून मयत झालेले संशयीतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्ध होते. या रुग्णांना न्युमोनिया, मधूमेह, अतिउच्चरक्तदाब, हृदय संबंधित आजार जडलेले होते. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आता याठिकाणी त्यांच्या उपचार करण्यास नकार दिला गेल्याने अखेर शेवटी या रुग्णांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले. परंतु, याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांच्या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अत्यावश्यक सेवेतील शासनाची संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे. खासगी डॉक्टरांना देखील रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. मात्र, शहरातील सर्वच खासगी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवली असून त्यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार न करणाऱ्या या खासगी डॉक्टरांना प्रशासनाचा धाक संपला असून प्रशासनाकडून यांच्यावर कारवाई होण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.