महाराष्ट्रदिनापासून पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात

महाराष्ट्रदिनापासून पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण गेल्या पावसाळ्यात तुडुंब भरूनही या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट शहरवासियासमोर गेल्यावर्षीप्रमाणे आ वासून उभे राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनापासून शहरात दहाटक्के पाणीकपात होण्याची शक्‍यता आहे. त्याला पालिकेच्या जबाबदार सूत्रांनी दुजोरा दिला आहे. गेल्या पाच वर्षात 35 टक्के वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत एकाही लिटरने न वाढलेला जलस्रोत दुसरीकडे यावर्षी लवकर सुरू झालेला कडक उन्हाळा आणि त्यामुळे पाण्याचे वाढलेले बाष्पीभवन यामुळे ही पाणीकपात नाईलाजाने करावी लागणार आहे. 

पवनात सध्या जो पाणीसाठा आहे. तो शहराला जुलैअखेर पुरेल असा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. मात्र, पाण्याचा गैरवापर, त्याबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा, वाढते बाष्पीभवन व येत्या पावसाळ्यावरील अल निनोचा प्रभाव यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी व पाण्याची काटकसर करीत योग्य तेवढाच वापर व्हावा या उद्देशातून ही पाणीकपात केली जाणार आहे. 

उद्योगनगरीत निवासाकडे सगळ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे दरवर्षी शहराची लोकसंख्या सात टक्‍यांनी वाढत आहे. त्यामुळेच 2011 मधील लोकसंख्या आता 22 लाख झाली आहे. परिणामी मूलभूत सुविधांवर मोठा ताण पडू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून असून वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले आहे. त्यात दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे गेल्यावर्षी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली होती. सुदैवाने गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे पवना भरले. त्यामुळे यावेळच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही,असे वाटत होते. पण यावेळी उन्हाळा लवकरच जाणवू लागला असून त्यामुळे पाणीवापर वाढला आहे. दुसरीकडे उन्हाच्या दाहकतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही वाढू लागले आहे 

वाढती लोकसंख्या,पाण्याचे वाढते बाष्पीभवन अशी उलट स्थिती असताना गेल्या पाच वर्षात एका लिटरच्याही पाणीस्त्रोताची वाढ झालेली नाही. बाष्पीभवनाबरोबरच पाण्याची गळती आणि चोरी रोखणारा बंद जलवाहिनी प्रकल्प तडीस नेण्याची नितांत गरज आहे. त्याजोडीने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्याच्या योजनेलाही गती द्यावी लागणार आहे. 

आकडे बोलतात 
शहराचा दररोजचा पाणीपुरवठा ः 465 ते 470 एमएलडी (दशलक्ष लिटर) 
प्रतिदिन दरडोई पाण्याची कायदेशीर तरतूद ः 135 लिटर 
पिंपरी-चिंचवडमधील प्रतिदिन दरडोई (प्रतिमाणशी) दिले जाणारे पाणी ः150 लिटर 
भामा आसखेड धरणामधून मिळणारे पाणी ः 167 एमएलडी 
आंद्रा धरणातून मिळणारे पाणी ः100 एमएलडी 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com