सांगलीचा राजवाडा राजांचा नव्हे, सरकारचाच ! 
सांगलीचा राजवाडा राजांचा नव्हे, सरकारचाच ! 

सांगलीचा राजवाडा राजांचा नव्हे, सरकारचाच ! 

राजवाड्याची इमारत आणि जागा 99 वर्षाच्या कराराने शासनाने घेतली होती अन्‌ हा करार लवकरच संपतोय, त्याआधीच या जागेचा व्यवहार एका बड्या राजकीय नेत्याशी झालाय, अशी चर्चा सांगलीभर पसरली आहे. नवे जिल्हाधिकारी कार्यालय बांधणे, घाईघाईत उद्‌घाटन करणे, यामागे तेच कारण आहे, असे सांगितले जात होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या साऱ्या फक्त अफवा असून त्या माझ्याही कानावर आहेत, असे स्पष्ट केले.

सांगली : सांगली संस्थानची ओळख असलेला राजवाडा व परिसर हा विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या मालकीचा नसून त्याची मालकी महाराष्ट्र शासनाकडे आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याकाळी राजांशी झालेला पत्रव्यवहार प्रशासनाकडे उपलब्ध असून त्यानुसार इथल्या इमारती आणि जागांची मालकी शासनाकडेच राहणार आहे. केवळ दरबार हॉल राजांच्या मालकीचा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

राजवाड्यातील इमारतीत सुरु असलेली प्रशासकीय कार्यालये सध्या नव्या इमारतीत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामागे राजवाड्यासह अन्य इमारती राजांकडे हस्तांतरीत होण्याचे कारण आहे का? किती वर्षांचा करार आहे, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. गायकवाड यांनी हा खुलासा केला. 

ते म्हणाले, ""स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्व राजांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यात असा उल्लेख होता की, "देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे प्रशासन राबवण्यासाठी इमारतींची आवश्‍यकता आहे. तहसिल कार्यालये, न्यायालये व अन्य व्यवस्था राजांकडे असलेल्या इमारतींमध्ये करायची आहे. या इमारती राजांनी लोकांकडून महसूल गोळा करून बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची मालकी खासगी असू शकत नाही. महसूल जमा झाल्यानंतर त्यातील किती पैसे खासगी वापरावेत, याला मर्यादा होत्या. याशिवाय, जर सरकारला भविष्यात या जमिनींची गरज राहिली नाही आणि त्या विकायच्या ठरल्या तर त्याच्या खरेदीचा पहिला हक्क राजांचा राहील.' यासंबंधीची सर्व कागदपत्रे आम्ही तपासलेली आहेत. त्यामुळे या इमारतींसह जागेची मालकी शासनाचीच आहे.'' 

ते म्हणाले, ""जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह न्यायालयाच्या दोन इमारती, कारागृह अशा एकूण 14 इमारती आहेत. येथील बहुतांश कार्यालये आता नव्या इमारतीत स्थलांतरीत होतील, मात्र त्याचवेळी अन्यत्र भाड्याच्या जागेत सुरु असलेली कार्यालये या जुन्या इमारतीत स्थलांतरित केली जाणार आहेत. ती प्रक्रिया सध्या गतीने सुरु आहे. पुढील वर्षभर टप्प्याटप्प्याने ती चालेल.'' 

राजवाडा परिसरातील दरबार हॉलची मालकी राजांकडेच आहे. या इमारतीचा एक मजला त्यांच्या मालकीचा होता, मात्र दुसरा मजला हा पहिल्या मजल्यावरच असल्याने तोही आपल्या मालकीचा आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण केल्यानंतर त्याला मान्यता मिळालेली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com