मारुतीराया तुम्हीच सांगा, पाणीयोजना आणली कुणी? विखेंनी की थोरातांनी ?    

मारुतीरायाच्या साक्षीने एकाच योजनेचे दोनदा भुमिपूजन झाल्याने, मारुतीराया तुम्हीच सांगा, ही योजना आणली कुणी? असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
Vikhe-Thorat-lord-hanuman
Vikhe-Thorat-lord-hanuman

संगमनेर (नगर):  संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावातील मारुती मंदीरासमोर राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काल सायंकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते भुमिपूजन झाले.

आज सकाळी त्याच योजनेचे त्याच ठिकाणी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भुमिपूजन झाले. त्यामुळे मारुतीरायाच्या साक्षीने एकाच योजनेचे दोनदा भुमिपूजन झाल्याने, मारुतीराया तुम्हीच सांगा, ही योजना आणली कुणी? असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील साईमंदिर संरक्षक भिंत व राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन काल रात्री प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात थोरात यांनी संगमनेरमधील शिक्षण, सहकार, सांस्कृतिक वातावरणाचा राज्यात बोलबाला आहे, मात्र बाहेरच्या प्रवृत्तींना हे सहन होत नाही, असा आरोप विखे पाटील यांचे नाव न घेता केला.

आज सकाळी मारुती मंदिराजवळ विखे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरठा योजनेचे भुमिपूजन पुन्हा झाले. या वेळी विखे पाटील यांनी थोरातांवर जोरदार हल्ला चढवताना, राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा आमदार निवडून देऊन काय उपयोग, त्यामुळे परिवर्तन करा, असा सल्ला विखे पाटील यांनी जनतेला दिला.

सारख्याच कामांचे दोन दिवसात, दोन विरोधी नेत्यांच्या हस्ते व समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करीत भुमिपूजन झाल्याने, ही कामे नक्की कोणी आणली असा प्रश्न राजकारणात स्वारस्य नसलेल्या ग्रामस्थांसमोर पडला आहे.

योजनेचे श्रेय थोरात यांचेच : सरपंच
तालुक्यातील गुंजाळवाडी व अंभोरे येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले आहेत. या योजनांचा सर्वे करुन घेवून त्याप्रमाणे नगरच्या पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहाणी केली होती.

त्याप्रमाणे इस्टिमेट तयार करुन, थोरात यांनी वरीष्ठ पातळीवर तसेच इंद्रजीत थोरात, व मी स्वतः यासाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे. या संपूर्ण योजनेचे श्रेय केवळ आमदार बाळासाहेब थोरात यांचे आहे, अशी प्रतिक्रीया अंभोरे ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर खेमनर यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com