जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमधील घाऊक व्यापारी किरकोळ भाजीपाला विक्री करताना आढळून आले. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या पाच व्यापाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी टाळण्यासाठी कमीत कमी लोकांना प्रवेश देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. तसेच भाजीपाला मार्केटमध्ये घाऊक व्यापाऱ्यांना किरकोळ भाजीपाला विक्री करू नये. याबाबतचे परिपत्रक देखील बाजार समितीने काढले होते. काल सकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये पाहणीसाठी गेले होते. यावेळी त्यांना काही नागरिक किरकोळ भाजीपाला घेऊन जात असताना दिसून आले. यावेळी त्यांनी या नागरिकांची विचारपूस केली असता. त्यांनी हा भाजीपाला यार्डातील काही व्यापाऱ्यांकडून खरेदी केला असल्याची माहिती दिली.
किरकोळ भाजीपाला विक्री करू नये याबाबतचे आदेश असताना देखील व्यापाऱ्यांकडून नागरिकांना किरकोळ भाजीपाला विक्री केला जात असल्याने सभापती कैलास चौधरी, सचिव रमेश माळी, कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, कृष्णा पाटील यांच्या पथकाने व्यापाऱ्यांवर कारवाई केली. पाच जणांवर गर्दी जमा करून संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाचही व्यापाऱ्यांचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.