ओरोस (सिंधुदुर्ग): मी शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचे धोरण मी ठरवितो, निर्णय मी घेतो. पक्षाच्या मुखपत्राचे जाहिरातदार हा निर्णय घेत नाहीत. नाणार रिफायनरीला असलेला शिवसेनेचा विरोध कायम आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शिवसेनाच्या मुखपत्रामध्ये नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने पक्षाची भूमिका बदलली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, नाणार संदर्भातील आमची भूमिका कायम आहे. नाणारबाबत माझ्या मनात काहीही चाललेले नाही.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिफायनरी व्हावी अशी मागणी केली असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, माझ्याकडे अद्याप कोणतीही अशी मागणी आलेली नाही. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
तपास केंद्राकडे दिल्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, "केंद्राने एल्गार परिषदेचा तपास राज्याकडून काढून घेतला आहे; पण दलित बांधवांवर झालेल्या अन्यायाचा तपास राज्याकडे दिलेला नाही. तो तपास राज्याकडेच आहे. या बांधवांवर मी अन्याय होवू देणार नाही.''
यावेळी त्यांनी आपण महाराष्ट्रात एनआरसी लागू करू देणार नसल्याचे सांगत हा कायदा लागू झाल्यास केवळ मुस्लिमांना नाही तर हिंदूनाही धोका असल्याचा पुनरउच्चार केला. सीएएमुळे कोणताही धोका नसल्याने त्याला पाठिंबा दिला आहे. तर एनपीए हा नवीन कायद्याबाबत अभ्यास सुरु आहे. प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होत असतेच, असे सांगत या कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.