आता विखे नाही तर थोरात -पवारांच्या हातात नगर झेडपीचा  रिमोट !

ता भाजपला म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला अध्यक्षपदाची संधी मिळणार नाही, हे निश्चित मानले जाते. या पदावर आता काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार कोणाची वर्णी लावतात, याबाबत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
vikhe_thorat_rohit
vikhe_thorat_rohit

नगर :  राज्यात सत्ता शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसची येत असल्याने नगरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे मनसुबे पुन्हा बदलली आहेत. आता भाजपला म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला अध्यक्षपदाची संधी मिळणार नाही, हे निश्चित मानले जाते. या पदावर आता काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार कोणाची वर्णी लावतात, याबाबत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मागील आठवड्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसला सत्ता मिळण्याची चिन्हे होती. बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यताही निर्माण झाली होती. त्यामुळे काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्ह्यातील इच्छुक नेते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सरसावले होते. त्यानंतर राजकीय घडामोडी होऊन सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने साखर झोपेत असलेल्या जिल्ह्यातील इच्छुक नेत्यांची झोपच उडाली. आता आपल्याला अध्यक्षपद मिळणार नाही, भाजपचे विखे पाटील आपल्याला संधी मिळू देणार नाही, या शक्यतेने सर्वजण थंड झाले होते. मात्र बुधवारी  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी व काॅंग्रेसची सरशी झाली आहे. त्यामुळे इच्छुक खडबडून जागे होत मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत.

सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या शालिनी विखे पाटील आहेत. मात्र विखे पाटील अध्यक्षपदी विराजमान झाल्या, त्या वेळी त्यांचे पती व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही कॉंग्रेसमध्ये होते आणि विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते. मात्र या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्याच तिकिटावर ते खासदारही झाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजयीही झाले. पती आणि पुत्र दोघेही भाजपमध्ये गेले असले, तरी शालिनी विखे पाटील यांनी मात्र कॉंग्रेस पक्ष सोडला नाही. असे असले, तरी काॅंग्रेस पक्ष जिल्ह्यात थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली आहे. थोरात आणि विखे यांच्यातील वैमनस्य अधिकच वाढले असल्याने शालिनी विखे पाटील सध्या काॅंग्रेसमध्ये असल्या, तरीही त्यांचा पुन्हा विचार होण्याची सुतराम शक्यता नाही.

महिला सर्वसाधारणसाठी राखीव
नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 आहे. मात्र एक सदस्य डॉ. किरण लहामटे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांची जागा रिक्त होऊन आता सदस्यसंख्या 72 असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या 50 टक्के आरक्षणानुसार 37 महिलांना सदस्य म्हणून स्थान मिळालेले आहे. त्यातच सर्वसाधारण जागांवर आणखी दोन महिला जिल्हा परिषदेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे महिला सदस्यांची संख्या 39 आहे. यंदा अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघालेले आहे. त्यामुळे काॅंग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महिला सदस्यांमध्ये अध्यक्षपदाचे स्वप्न पाहिले जात आहे.

बलाबलात काॅंग्रेसचीच सरशी
जिल्हा परिषदेत सध्या काॅंग्रेस 23, राष्ट्रवादी १९, भाजप 13, शिवसेना 7, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 5, महाआघाडी 2 कम्युनिष्ट पक्ष 1, शेतकरी विचार मंच 1 व जनशक्तीचा 1 असे बलाबल आहे. एकूण 72 सदस्य आहेत. हे बलाबल तांत्रिक असले, तरी विधानसभेच्या दरम्यान सर्व बदलले आहे. त्यामुळे पक्षिय बलाबलाचा विचार या वेळी होण्याची शक्यता नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com