बाणखेलेंच्या फालतू टिकेला उत्तर देण्याची गरज नाही : वळसे पाटील

बाणखेलेंच्या फालतू टिकेला उत्तर देण्याची गरज नाही : वळसे पाटील

मंचर : आमदार व मंत्री पदाच्या कालावधीत माझ्या शेजारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राजाराम बाणखेले, अरुण गिरे बसत होते. त्यावेळी त्यांना माझी विकासकामे दिसत होती. पण आता पक्ष बदलल्यामुळे त्यांना विकासकामांचा विसर पडला आहे. हे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

मी कधीही कोणाची निंदानालस्ती केली नाही. पक्षाची व केलेल्या कामांची भूमिका मांडण्याचे काम सतत केले आहे. जनतेचा पाठींबा व आशीर्वादाच्या जोरावर यावेळी मी विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात कळंब, पिंपळगाव, अवसरी खुर्द, गावडेवाडी येथे झालेल्या प्रचारसभेत वळसे पाटील यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ते म्हणाले, "शिवसेनेचे उमेदवार सध्या दररोज शिमगा सण साजरा करत आहेत. यापूर्वी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील व माझ्यावर एक छापा तर दुसरा काटा अशी अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करून टीका केली होती. राजाराम बाणखेले कधीही कोणाबद्दल चांगले बोलल्याचं ऐकवत नाही. त्यांच्या फालतू टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. मतदानाची टक्केवारी वाढवून विक्रमी मताधिक्‍य निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) भूमिपूजन झाले. त्यावेळी फक्त डाव्या कालव्याच्या कामाची तरतूद होती. माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील, लोकनेते किसनराव बाणखेले, बी डी काळे यांनी मुख्यमंत्री पदावर असलेले शरद पवार साहेबांकडे मागणी केल्यामुळे उजवा कालवा मंजूर झाला. पण पुढे निधीअभावी धरणाचे व कालव्याचे काही काम रेंगाळले होते.

मी आमदार झाल्यानंतर कामाला गती आली. कालव्यांच्या कार्यक्षेत्रात नदीवर बंधारे बांधण्यास परवानगी नव्हती. खास बाब म्हणून मंजुरी मिळाल्याने घोड व मीना नदीवर 79 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. त्यापैकी 62 बंधारे 1990 नंतर झालेले आहेत. हा इतिहास विरोधकांनी तपासून पाहवा. इतिहासाची तोडमोड करणाऱ्या विरोधकांची कीव येते. किसनराव बाणखेले व माझ्या कधीही वैर नव्हते. किसनराव शिवसेनेत होते. त्यावेळी त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी होती. त्यावेळी किसनराव यांची शिफारस न करता. नाना बलकवडे यांची शिफारस राजाराम बाणखेले यांनी केली. बलकवडे यांचाच राजाराम यांनी प्रचार केला. किसनराव बाणखेले यांना मानसिक त्रास देण्याचे काम कुणी केले हे सर्वांना माहित आहे. त्यावेळी मंचरची अस्मिता का आठवली नाही, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी देवेंद्र शहा, देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, वसंतराव भालेराव, (स्व) किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव रामदास बाणखेले, नातू युवराज बाणखेले, राजू इनामदार, उषा कानडे, प्रभाकर बांगर, शरद शिंदे, ज्ञानेश्वर गावडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com