पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडलेल्यांना धडा शिकविण्याची आग्रही मागणी करीत त्यांना आता पक्षात घेऊ नका, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीत यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तो आणखी वाढेल. मात्र, गटातटाचे राजकारण करणाऱ्यांना जवळ करू नये, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणि ऐन प्रचारात राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी विशेषत: माजी आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
मात्र, निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले असून, शहरातील आठपैकी दोन जागांवर राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत. तर, खडकवासल्यात राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला आहे. या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षात आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडलेल्यांना पुन्हा संघटनेत स्थान देऊ नये, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले आहे. हा विजय त्यांचा आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह कायम ठेवण्यात येईल. पक्ष सोडणाऱ्यांबाबत नेतृत्व निर्णय घेईल, असे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.