नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकास कामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात अधिकाऱ्यांच्या मॅरॉथॉन बैठकांचा सपाटा लावला आहे. नागपुरात अनेक विकास कामांची घोषणा करण्यात आल्या परंतु अद्यापही बरीच कामे अपूर्णावस्थेत आहेत. मेट्रो रेल्वे सुद्धा निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्यता नाही. मेट्रोचा पहिला टप्पा येत्या फेब्रुवारी महिन्यापासून उद्घाटन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु कामांचा वेग पाहता मेट्रोची शिटी वाजण्याची शक्यता कमीच आहे.
निवडणूक आचारसंहिता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन गडकरींनी अधिकाऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत कामे आटोपण्याचे निर्देश दिले आहेत. नागपुरातील केळीबाग-जुना भंडारा रस्ता सहा पदरी करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत निविदा काढण्याचे निर्देश दिले. पारडी उड्डाण पुलाचे जमीन संपादन 25 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना गडकरींनी केली. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपूल तोडून तेथील दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय यशवंत स्टेडीयमचे पुनर्बांधणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक, बुधवार बाजारचे डिझाईन आदी कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.
ही कामे अपूर्ण असल्याने आता या दोन्ही नेत्यांनी अधिकाऱ्यांना कामांचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. विकास कामांसाठी केवळ 1 महिन्यांचा कालावधी उरला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच विकास कामांचा श्रीगणेशा करावा, असे गडकरींनी निर्देश दिले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.