सहा तास काम करणारे मुख्यमंत्री राज्याचे काय भले करणार? नितेश राणेंचा सवाल
कामशेत : "महाविकास आघाडीचे हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि आम्ही ते टिकूनही देणार नाही. हे महाआघाडीचे नव्हे महाभकास आघाडीचे सरकार आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर झाला. याच सुमारास मुख्यमंत्री महाबळेश्वरला सुटीला गेले. दिवसातून फक्त सहा तास काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार,'' असा घाणाघात आमदार नीतेश राणे यांनी केला.
येथे एका कार्यक्रमानिमित्त राणे येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, "माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची उकल जवळून अनुभवली आहे. त्या तुलनेने मुख्यमंत्री ठाकरे याचे काम नगण्य आहे. 59 दिवसांत या सरकारने एकही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्याच्या धडाकेबाज कामकाजात शिवसेनेचे वाटायला काहीच येत नाही. अनेक महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार करीत आहेत.''
ते पुढे म्हणाले, ''हे सरकार फार काळ टिकणार नाही. राज्याचे राजकारण कर्जमाफी या एका मुद्द्याभोवती फिरविले जात आहे. केंद्र सरकार शेतकरी हितासाठी सोळा कलमी कार्यक्रम राबवीत आहे. मात्र येथे महाआघाडी सरकारमध्ये केवळ कर्जमाफी हा एक कलमी कार्यक्रम आहे. त्याचीही तारीख निश्चित केली नाही. कर्जमाफीमुळे राज्यातील इतर विकासकामांना ब्रेक लावण्याचे काम हे सरकार करीत आहे.''
हे देखिल वाचा - अबब! फडणवीस सरकारने केला जाहिरातींवर एवढा खर्च
राणे म्हणाले, "भाजप सरकारने नगर उत्थानासाठी वेगवेगळ्या विकासावर भर दिला होता. मात्र या सरकारच्या डोक्यातून अजून कर्जमाफी उतरली नाही. निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री ठाकरे आपण पाहिले. आता ते गप्प आहेत. कर्जमाफी करणार असल्याचा अध्यादेश या सरकारने काढला. पण त्यावर अंमलवबाजवणी कधी करणार याची तारीख नोंदली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेला महाराष्ट्राच्या नकाशावरून हटविल्याशिवाय महाराष्ट्राचा सातबारा कोरा होणार नाही.'' माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यावेळी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.