`राष्ट्रवादी लोकसभेसाठी पुण्यात पठडीबाहेरचा उमेदवार देणार`

`राष्ट्रवादी लोकसभेसाठी पुण्यात पठडीबाहेरचा उमेदवार देणार`

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अजून ठाम असून ही जागा मिऴाल्यास पठडीबाहेरचा उमेदवार देणार असल्याचा दावा पक्षाने आज केला. दुसरीकडे काॅंग्रेसने आघाडी धर्माचे पालन करणार असल्याचे सांगत जो उमेदवार मिळेल त्याचे काम करणार असल्याचे सांगितले.

या चर्चेला निमित्त होते ते वाडेश्वर कट्ट्यावरील चर्चेचे. पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांना या कट्ट्यावर बोलविण्यात आले होते. या कट्ट्यावर संजय काकडे, काॅंग्रेसकडून मोहन जोशी, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, मनसेचे नेते बाबू वागस्कर उपस्थित होते. विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि भाजपकडील तिसरे इच्छुक पालकमंत्री गिरीश बापट हे व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या वेळी सांगितले की पुण्याच्या जागेचा वाद मुंबईतील बैठकीत सुटेल. आमची ताकद पुण्यात वाढली आहे. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे. पुण्याची जागा राष्ट्रवादीला मिळावी हा शरद पवारांचा प्रयत्न आहे. आम्हाला जागा मिळाल्यास राजकीय पठडीबाहेरचा वेगळा उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यापूर्वी पुण्यात स. गो. बर्वे यांना पुणेकरांनी निवडून दिले होते. तसाच राष्ट्रवादीचा प्रयत्न यावेळी असेल, असेही त्यांनी सांगितले. परंतु जो काही निर्णय होईल त्यानुसार आघाडीच्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोहन जोशी यांनी सांगितले की 1999 ला मी निवडणूक लढवली तेव्हा सव्वा दोन लाख मते मी घेतली होती. त्यावेळी पुण्याची मतदारसंख्या 10 लाख होती. आमची स्थानिक पातळीवर बैठक झाली आहे. पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याला सर्वांनी एकमताने निवडून आणायचे असे आमच्यात ठरले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्याचा सर्व्हे केला आहे. त्यांना पुण्यात राष्ट्रवादी कडून धोका होण्याची भीती वाटते असे दिसून आले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याबद्दल काँग्रेसच्या सतीश देसाई यांनी सांगितले, की पक्षश्रेष्ठींनी कोणालाही तिकीट दिले तरी दोन्ही काँग्रेस त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणतील.

"मनसे शर्यतीत सर्वात पुढे आहे. आघाडीत जायचे की नाही याचा निर्णय राजसाहेब घेतील," असे बाबू वागस्कर म्हणाले.

"शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे स्वतः स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रकार शिवसेनेत नसतो," असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. मोदी सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने जनतेत नाराजी आहे. परंतु अखेरीस उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे शिवसैनिक काम करतील असे त्यांनी स्पष्ट केले.

मला भाजपचे तिकीट मिळेल याची खात्री आहे. काँग्रेसकडून मी उभा राहणार या अफवा आहेत. मेरीटला महत्व आहे. ज्यांच्या मागे लोक आहेत, ज्यांचा फिटनेस आहे, ज्यांची ताकद आहे अशांनाच तिकीट मिळेल, असे संजय काकडे यांनी सांगितल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com