शरद पवारांनी घोटीच्या महिलांनी मांडलेल्या व्यथा पंतप्रधान मोदींकडे पोहोचविल्या
नाशिक : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात 325 तालुक्यांना झळ बसली आहे. नाशिकच्या पिकांची मोठी हानी झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने आपण पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत त्यांना चार पानी पत्र देऊन परिस्थितीची माहिती दिली. राज्यात 54.22 लाख हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन, भात, भाजीपाला, मका, बाजरी, कांदा आणि टोमॅटो या पिकांसह भाजीपाल्याच्या अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये फलोत्पादन पिकांत द्राक्षांची मोठे नुकसान झाले. विशेषतः बागलान, दिंडोरी, कळवण तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षे पक्व स्थितीत असतांना त्यांना अतिवृष्टीची झळ बसली. या जिल्ह्यातील आठ आदिवासी तालुक्यांतील पिके पुर्णतः नष्ट झाली आहे. टाके घोटी येथील राजुबाई आडोळे या आदिवासी महिलेने मांडलेली व्यथा, अडचणींचा आपल्या पत्रात विशेष उल्लेख केला आहे. या महिलांनी भात व अन्य पिकांची अतिवृष्टीने झालेले नुकसान मांडताना परिसरातील नागरिकांच्या व्यथाही त्यांच्या कानी घातल्या होत्या. त्याची खास दखल शरद पवार यांनी घेतली आहे.
गेल्या दहा महिन्यात या भागातील 44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील 3.50 लाख हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र असंख्य शेतकऱ्यांनी कर्जमाफी विषयी तक्रारी केल्या आहेत. अनेकांना कर्जमाफी मिळालेली नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने शेतकऱ्यांना साह्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली. पवार यांच्या चार पानी पत्रात त्यांनी नाशिकसह विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणींची विशेष दखल घेऊन पंतप्रधान मोदींपर्यंत त्या पोहोचविल्या. त्यामुळे या भागातील शेतकरी, कार्यकर्ते यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.