भाजपला सरपंचांपासून पंतप्रधानांना प्रचाराला आणावे लागले : सुप्रिया सुळेंचा चिमटा

''पार्टी विथ डिफरन्स असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत विकास केला म्हणता. पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता तर प्रचारात फौजा उतरविण्याची वेळ आली असती का,'' असा सवाल करून भाजपला सरपंचांपासून पंतप्रधानांना प्रचाराला आणण्याची वेळ आल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
Supriya Sule
Supriya Sule

येवला  : ''पार्टी विथ डिफरन्स असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत विकास केला म्हणता. पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता तर प्रचारात फौजा उतरविण्याची वेळ आली असती का,'' असा सवाल करून भाजपला सरपंचांपासून पंतप्रधानांना प्रचाराला आणण्याची वेळ आल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारानिमित्त येथे आल्या असताना झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल का?, या प्रश्‍नांवर त्यांनी स्मितहास्य केले आणि असे होऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर बारामतीवरून साखर येथील पत्रकारांना पाठवेन, असे त्या गमतीने म्हणाल्या. केंद्र आणि राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सत्ता असताना आणि प्रकरणे इतकी जुनी असताना विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणुकीच्या अगोदरच का नोटिसा दिल्या जातात, असा सवाल त्यांनी केला.

त्या म्हणाल्या की, हे दडपशाही करणारे सरकार आहे. हे राज्यातील आणि देशातील लोकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. सरकारकडून प्रफुल्ल पटेल यांना निवडणुकीच्या तोंडावर का नोटीस दिली जाते, हा प्रश्‍न असून, कोर्टाच्या ऑर्डरसंबंधीचे पुरावे जर हे सरकार मानणार नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुठलेही सरकार असेल तर त्यांनी प्रशासनाचा चांगला वापर करावा, गैरवापर करू नका, असा टोला त्यांनी या वेळी लगावला.

देशातील व राज्यातील सर्वसामान्य जनता या सरकारविषयी नाराज आहे. गेल्या पाच वर्षांत न शिक्षण स्वस्त राहिले, न आरोग्य चांगले राहिले, असे सांगत सुळे पुढे म्हणाल्या, ''सर्वसामान्य माणूस या सरकारला त्रासला आहे. महागाई व बेरोजगारीला त्रासाला आहे. भाजप सरकारकडून कॉंग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता भाजपमुक्त भारत करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या विधानसभेच्या 150 उमेदवारांपैकी 70 उमेदवार हे आयात केलेले उमेदवार आहेत.'' या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, अंबादास बनकर, वसंत पवार, साहेबराव मढवई, मोहन शेलार, दीपक लोणारी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com