नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच अद्याप कायम असल्याने या भेटीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एका बाजूला शिवसेना - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करण्याबाबतच्या हालचाली सुरु आहेत. दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ''राज्यात सरकार स्थापनेबाबत आमची चर्चाच झाली नाही,'' असे पवार यांनी सांगितले होते. तर राज्यात सरकार स्थापनेबाबत भाजप-शिवसेनेलाच विचारा असे सांगून त्यांनी नव्या चर्चेला वाट करुन दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर पवार व मोदी यांची भेट होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मात्र, या भेटीबाबत अन्य अर्थ काढू नका, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, ''राष्ट्रवादीत शरद पवार अध्यक्ष आहेत ते निर्णय घेत असतात. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. देशाचे राज्याचे प्रश्न घेऊन त्यांना नेते भेटत असतात. दोन दिवसांपूर्वी आम्ही शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नी पुढाकार घेत माहिती मोदींना द्यावी ,अशी मागणी केली होती सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जावे अशीही विनंती आम्ही पवार यांना केली होती." राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ही भेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच असल्याचे सांगितले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.