पाण्याचा घोट घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राष्ट्रवादीला पाणी पाजायचंय !

अंबाजोगाई येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना राहूल गांधी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली.
पाण्याचा घोट घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राष्ट्रवादीला पाणी पाजायचंय !

अंबाजोगाई : पंकजा व डॉ. प्रीतम मुंडे या गोपीनाथ मुंडेंचा वारसा सक्षमरित्या चालवित असल्याने त्यांना गोपीनाथरावांचे नाव लावण्याचा अधिकार आहेच. दिवंगत मुंडेंमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याने आम्हीही त्यांचे नाव लाऊ शकतो. असे सांगतच विरोधकांना तुम्ही काय लढणार, तुमचा कप्तान सातव्या दिवशी खेळातून (माढ्यातून शरद पवारांची माघार) परत गेला असा विरोधकांवर घणाघात करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा कोरडा पडला आणि त्यांनी पाण्याचा घोट घेतला. पण, यावेळीही त्यांनी "पाणी पितोय कारण राष्ट्रवादीला पाणी पाजायचंय!' असा टोला लगावला. 
शुक्रवारी रात्री येथील भाजपच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधी, शरद पवार, तत्कालिन आघाडी सरकारवर जोरदार टिका करताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याची पावती देत ती हिंमत यापूर्वीच्या पंतप्रधानात नव्हती असे जोशात सांगीतले. 
विरोधकांकडे कामाचा मुद्दा नसल्याने जातीचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करत लोक जातीवर मत देत नाहीत असेही ते म्हणाले. सत्तेच्या 15 वर्षांत आरक्षण का दिले नाही असा सवाल करत मराठा समाजासह सर्वच समाज भाजपसोबत राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहूल गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला, पण त्यासाठी पैसे कोठून आणणार याचे त्यांच्याकडे उत्तर सल्याचे ते म्हणाले. यापूर्वी त्यांचे पंजोबा, आजी, वडिल पंतप्रधान होते. आई युपीएच्या अध्यक्षा होत्या. तेव्हा का हटविली नाही असा सवाल करत देशाची गरिबी हटवायला मोदी खंबीर असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेस केवळ 
चेल्याचंपाट्यांची गरिबी हटवत असल्याचा आरोप करत राहुल गांधी व शरद पवार यांचे घोषणपत्र म्हणजे कोंबड्या विकण्याच्या धंदा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. एखाद्या टिव्ही मालिकेत ज्याप्रमाणे सुरुवातीला ही घटना काल्पनिक असून याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही असे लिहून येते तसे काही दिवसांनी राहूल गांधी यांच्या भाषणापूर्वीही येईल असेही फडणवीस म्हणाले. यापूर्वी पाकिस्तानने हल्ले केल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान केवळ चर्चा करायचे. त्यांच्यात प्रतिहल्ला करण्याची हिम्मत नव्हती. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिम्मत दाखवून दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com