भाजप नेत्यांचा मृत्यू विरोधकांच्या जादूटोण्याने; प्रज्ञासिंह पुन्हा बरळल्या

माजी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या निधनाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोपाळमधील भाजप कार्यालयात आज श्रद्घांजली सभेचे आयोजन केले होते. या वेळी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांबद्दलच्या आठवणी जागविल्या. प्रज्ञा ठाकूर यांनी बोलण्यास सुरवात केल्यानंतर भाजप नेत्यांच्या मृत्युबाबत जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त केला.
भाजप नेत्यांचा मृत्यू विरोधकांच्या जादूटोण्याने; प्रज्ञासिंह पुन्हा बरळल्या

भोपाळ : गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचे निधन झाले. या नेत्यांचे निधन आजारपणामुळे झाले असले तरी भाजपच्या खासदार यांनी विरोधकांना जबाबदार ठरविले आहे. "विरोधक 'मारक शक्ती'चा (जादूटोणा) प्रयोग करीत असल्यानेच या नेत्यांचा आकस्मिक मृत्यू झाला,'' असे अजब विधान प्रज्ञा ठाकूर यांनी सोमवारी केले. 

माजी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या निधनाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोपाळमधील भाजप कार्यालयात आज श्रद्घांजली सभेचे आयोजन केले होते. या वेळी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांबद्दलच्या आठवणी जागविल्या. प्रज्ञा ठाकूर यांनी बोलण्यास सुरवात केल्यानंतर भाजप नेत्यांच्या मृत्युबाबत जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त केला. विरोधी पक्ष 'मारक शक्ती'चा प्रयोग करीत असल्यानेच भाजप नेत्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

यासंदर्भात बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, "मी जेव्हा निवडणूक लढवित होते, तेव्हा एक महाराज आले होते. खूप वाईट काळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. तुम्ही तुमच्या साधनेचे बळ वाढवा. तुमचा पक्ष आणि त्याच्या नेत्यांसाठी विरोधक जादूटोणा करीत आहे. तरी तुम्ही सावधगिरी बाळगा, असा सल्ला त्यांनी दिला होता.'' प्रज्ञा ठाकूर यांनी 'महाराजां'बद्दल अधिक माहिती मात्र दिली नाही.
 
एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या की, मी ही गोष्ट विसरून गेले होते. पण आमच्या पक्षाच्या नेत्यांचे एकामागोमाग निधन होत असल्याचे दिसत असताना मला त्या महाराजांचे बोल आठवत आहेत. ते सत्य बोलले होते का? पण हे खरे आहे की, आमचे वरिष्ठ नेते आमच्यातून अकाली निघून जात आहेत. तुम्ही त्यावर विश्‍वास ठेवा अगर नाही, मात्र हे सत्य आहे आणि तसेच घडत आहे. ठाकूर यांनी या वेळी नुकत्याच मरण पावलेल्या भाजपच्या नेत्यांची नावेही घेतली. त्यांनी मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज, बाबूलाल गौर आणि आता अरुण जेटली यांच्या निधनाचा संबंध 
'महाराजां'च्या  कथनाशी जोडला. 

प्रदेश भाजपकडून समज
स्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या विचित्र वक्‍त्यव्याने मध्य प्रदेशमधील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचे विधान सर्वत्र पोचल्यानंतर काही वेळातच मध्य प्रदेश भाजपचे प्रमुख राकेशसिंह यांनी खासदार प्रज्ञासिंह यांना समज दिली. प्रज्ञासिंह यांच्याशी त्यांनी बंद खोलीत चर्चाही केली. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रभात झा यांनी साध्वी यांच्या या विधानावरून हात झटकले. प्रज्ञासिंह यांच्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com