पवारांना खुश करण्यासाठी शिंदे रेटून खोटे बोलतात - नरेंद्र पाटील

 पवारांना खुश करण्यासाठी शिंदे रेटून खोटे बोलतात - नरेंद्र पाटील

भिलार : आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात माथाडी कामगारांची जी कामे झाली नाहीत, ती कामे साडेचार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली आहेत. केवळ शरद पवार यांना खुश करण्यासाठी " खोटे बोल पण रेटून बोल' या प्रवृत्तीनुसार बोलणाऱ्या माथाडी नेत्यांनी मुख्यमंत्र्याविषयी बोलत असताना जीभ सांभाळावी अशी टीका माथाडी नेते तथा आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांचेवर केली आहे. 

खिंगर (ता.महाबळेश्वर ) येथे कार्यकर्त्याशी संवाद साधल्यानंतर श्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. नरेंद्र पाटील म्हणाले की, माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्‍नासह अन्य प्रश्‍नांविषयी कॉंग्रेसने खोडा घातला होता. त्यामुळे माथाडी कामगारांचे प्रश्‍न आघाडी सरकारच्या काळापासून प्रलंबित होते. युती सरकारच्या काळात मी आमदारकीची पर्वा न करता सतत माथाडींच्या प्रश्‍नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यावर कामगारांचा वडाळा गृहप्रकल्प मार्गी लागला. त्याचप्रमाणे शासनाने 36 माथाडी मंडळांचे एकत्रीकरण करण्याचा घेतलेला जाचक निर्णय त्यांच्याद्वारे रहित करवून घेतला. 

शेतमाल नियमनमुक्त केला, माथाडी कामगारांना कायम रोजगार मिळण्यासाठी अध्यादेश काढणे, माथाडी कामगारांना माथाडी पतपेढीने कर्ज देण्यास सूट देण्यासह इतर निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांच्या प्रश्‍नावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी अध्यादेश वाचावेत, असा सल्ला नरेंद्र पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. 

शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप व मी हे सर्व अध्यादेश एकत्रपणे बसून वाचत असतो त्यामुळे हे सर्व कुणी केले हे माहित असूनही मुख्यमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे तद्दन वेडेपणा आहे. मला तिकीट अजून मिळाले नाही जनतेतून मी लढावं असा सूर येत आहे त्या अगोदरच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. एकीकडे माथाडींचे नेते म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र सर्व कॉन्ट्रॅक्‍ट यांच्याकडे, तुमच्यासारखे आम्ही आण्णासाहेबांच नाव घेत राजकारण करून कारखाने घेतले नाहीत, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. 

माथाडी कामगारांच भलं करण्यासाठीच आमची कारकीर्दपणाला लावली असल्याचे स्पष्ट केले . निवडणुकीविषयी विचारले असता श्री. पाटील म्हणाले, मला सहा वर्षांपेक्षा सहा महिन्यांची कारकीर्द बरी वाटली आणि लोकांमधून माझ्या उमेदवारीची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माथाडींच्या नेतेपदाविषयी बोलताना कोण किती पाण्यात आहे? हे काळच ठरवेल निवडणुकीनंतरच याची चुणूक दिसेल, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com