कोकणातील संघर्ष यात्रेमुळे राणेंची पंचाईत

कोकणातील संघर्ष यात्रेमुळे राणेंची पंचाईत

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वच विरोधी पक्षांनी एकजुटीने सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील यात्रा कोकणातील तिन्ही जिल्ह्यांतून जाणार आहे. नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून ही यात्रा जाणार असल्याने ते यात्रेत सहभागी होणार किंवा नाही, या विषयी तर्क वितर्क लढविले जात आहेत. 

भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत राणे यांचे अजूनही तळ्यात मळ्यात आहे. सध्या तरी ते कॉंग्रेसमध्ये असले तरी भाजपमध्ये जाण्याची संभाव्य शक्‍यता असल्यानेच ते संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाले नव्हते. तिसरा टप्पा मात्र कोकणातून जाणार आहे. रायगडहून सुरूवात होऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या मार्गे सातारा येथे यात्रेचा समारोप होणार आहे. कोकणातून यात्रा जाणार असल्याने कोकणवासियांसमोर घणाघाती भाषणे करण्याची आयती संधीच राणे यांना मिळणार आहे. परंतु राणे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याने विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सहभागी होऊन भाजपची नाराजी ओढवून घेणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे राणे यांची "इकडे आड, तिकडे विहीर" अशी मनःस्थिती होऊ घातल्याचे सूत्रांनी सांगितले. 

यात्रेच्या अगोदरच राणे भाजपमध्ये दाखल होतील. विरोधकांच्या यात्रेचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपकडून राणे यांचा प्रवेश लवकर घडवून आणला जाईल. जर राणे यांचा यात्रेपूर्वी भाजप प्रवेश झाला नाही, आणि ते संघर्ष यात्रेत सहभागी झाले तर कदाचित ते भाजपमध्ये जाणारच नाहीत, असे बोलले जात आहे. संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झाले नाहीत, आणि भाजपमध्येही त्यांचा लगेच प्रवेश झाला नाही तर आज ना उद्या ते भाजपमध्ये जातील असाही त्यातून अर्थ काढता येईल. त्यामुळे विरोधकांची तिस-या टप्प्यातील संघर्ष यात्रा राणे यांना डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 

निवडणुकीचाही मुहूर्त 
रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. या निवडणुकीत शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. संघर्ष यात्रेतही हे तिन्ही पक्ष उतरलेले आहेत. तिस-या टप्प्याची सुरूवात रायगड किल्ल्यापासून शिवाजी महाराजांना अभिवादन करून होणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेऊनच रायगड येथून तिसरा टप्पा सुरू करण्याची खेळी विरोधकांनी केली असावी, असे बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com