मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री व गृहमंत्री या दोघांवरही कारवाई करावी, अहवाल कपोलकल्पित...

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून खातरजमा करायला हवी होती. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्याकडून रिपोर्ट तयार करून घेतला. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

नागपूर : अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मुंबई तीन दिवस अंधारात होती. गृहमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी चीनने सायबर हल्ला केल्याने आमचे ग्रीड फेल झाल्याचा कपोलकल्पित अहवाल तयार करीत जनतेची दिशाभूल केली, असा स्पष्ट आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र परिषदेत केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री व गृहमंत्री या दोघांवरही कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीवर राज्याच्या आयपीएस अधिकाऱ्याने अहवाल तयार केला. त्यात त्याने याचा संबंध चीनशी जोडला. निदान त्या आयपीएस अधिकाऱ्याने केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करून खातरजमा करायला हवी होती. केवळ न्यूयॉर्क टाइम्सने छापले म्हणून असा अहवाल तयार करणे चुकीचे आहे. अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपवण्यासाठी ऊर्जामंत्री व गृहमंत्री धडधडीत खोटे बोलत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चिनी सायबर हल्ल्यामुळे १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याचे सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले होते. त्यावर ते बोलत होते.

आपली स्काडा यंत्रणा सायबर अटॅकच्या लेव्हलला यायला खूप सुधारणा कराव्या लागतील. महाराष्ट्रातील ट्रान्समीशन लाइन ३३ केव्हीपर्यतच आहे. आपण अजूनही मॅन्यूअलीच काम करतो. आमची व्यवस्था अजूनही सायबर अटॅक व्हावा इतकी मजबूत नाही. स्काडा सिस्टिम सेंटर सबस्टेशन लेव्हलवर आहे. ती सायबर अटॅकच्या लेव्हलवर आणायला ५० हजार कोटी हवेत, असे बावनकुळे म्हणाले. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर १०० युनिटपर्यंत वीज बिल माफी व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याचे पाप लपवण्यासाठी त्यांनी हे काहीबाही ठोकून दिले. तीन-तीन दिवस दोन वाहिन्या ब्रेक डाऊन राहतात आणि मंत्री काय करतात? खरं तर या दोन्ही मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. आयपीएस अधिकाऱ्याचा अहवाल न तपासता खोटे ते बोलले.

एमईआरसीने निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सुबोधकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. यात अनेक तज्ज्ञ सदस्य आहेत. या तिघांच्या समितीने याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मुंबईला ४०० केव्हीच्या चार लाइन्स येतात. त्यातील दोन लाइन ब्रेक डाऊन होत्या. त्या काय सायबर हल्ल्यामुळे ब्रेक डाऊन झाल्या होत्या काय, त्याचे कंडक्टर याच कारणामुळे तुटले होते काय, असे प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केले. तिसरी लाइन ओव्हर ट्रिपींग होऊन स्पार्कींग व्हायला लागले, तेव्हा अधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते ९ या वेळेत आवटेज मागितले होते. पण, त्या नंतरही ९ पर्यंत दुरुस्ती झाली नाही. त्यानंतर तिसरी लाइन नादुरुस्त झाली. त्यानंतर कळवा खारघरच्या चवथ्या लाईनवर लोड आले, तेव्हा ती खारघरच्या लाइनमनने मॅन्यूअली बंद केली. यात सायबर अटॅकचा संबंध येतोच कुठे, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

केंद्राला पत्र लिहिणार
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून खातरजमा करायला हवी होती. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्याकडून रिपोर्ट तयार करून घेतला. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे. आपण या संदर्भात केंद्राला पत्र लिहिणार आहे आणि खातरजमा करणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com