गोस्वामींच्या जामिनाचा दाखला देत आरोपीनं मागितला जामीन अन् उच्च न्यायालय म्हणाले...

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या निकालाचा दाखला दुसऱ्या एका आरोपीने जामिनासाठी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
buldhana man cites arnab goswami verdict in high court for bail
buldhana man cites arnab goswami verdict in high court for bail

नागपूर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. बुलडाण्यातील एका व्यक्तीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्याने जामीन मिळवण्यासाठी गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनाच्या दाखला उच्च न्यायालयाला दिला होता. मात्र, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून मागील वर्षी 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला होता. 

बुलडाण्यातील खामगाव येथील एका व्यक्तीवर तरुणीचे लैंगिक शोषण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात गोस्वामींना नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या निकालाचा दाखला आरोपीने उच्च न्यायालयासमोर दिला. 

यावर उच्च न्यायालय म्हणाले की, दोन्ही प्रकरणात साधर्म्य नाही. त्यामुळे त्या प्रकरणाचा निकाल या प्रकरणाला लागू होत नाही. या आरोपीमुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात त्याला कोणताही दिलासा देता येणार नाही. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे. 

दरम्यान, इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत आहे, असे अन्वय या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. हा तपास नंतर बंद करण्यात आला होता. मागील वर्षी मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com