अकोला : अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गावात विना परवानगी जमाव किंवा परवानगीपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे आढळून आल्यास संबंधित सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. सोबतच तलाठी व ग्रामसेवकांवरसुद्धा प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डॉ. नीलेश अपार यांनी अकोला तालुक्यातील सरपंचांसह तलाठी व ग्रामसेवकांना नोटीस बजावल्या आहेत.
अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय. अनेक गावकऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. गावागावांत नागरिक विनाकारण गर्दी करतात. या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. कुठल्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. गावात लग्न असल्यास या लग्नातही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परवानगी काढूनही लग्नात गर्दी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती जास्त आहे. गावातील विनाकारण गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासन वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना करत आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी गावाच्या सरपंचासह, तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत.
‘आपले अधिनस्थ संबंधित गावामध्ये अंत्यविधी, लग्नसमारंभ इत्यादी कार्यक्रम कुठलीही प्रशासनाची परवानगी न घेता आयोजित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परवानगीच्या काही कार्यक्रमांत मर्यादेपेक्षा जास्त नागरिक सहभागी होत असल्याकारणाने ग्रामीण भागामध्ये कोविडचा प्रसार जास्त प्रमाणात होत असून त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अंतर, मास्क न लावणे, सॅनीटायझरचा वापर न करणे, या बाबी कारणीभूत ठरत आहेत. याबाबत संबंधित गावाची सामाजिक व प्रशासकीय जबाबदारी उक्त आदेशान्वये आपणावर आहे, आपणाकडून कार्यवाही होत नाही व याबाबत आपणाकडून कोणत्याही प्रकारची माहिती पोलीस विभाग व प्रशासनास सादर केली जात नाही. त्यामुळे कोविड रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे’, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
नोटीसमध्ये डॉ. अपार म्हणतात, ‘याव्दारे आपणास निर्देश देण्यात येत आहेत की, आपल्या अधिनस्थ गावामध्ये आयोजित कार्यक्रमास मर्यादेपेक्षा जास्त गर्दी होणार नाही. तसेच पार पडत असलेल्या कार्यक्रमाची माहिती संबंधित पोलिस स्टेशन यांना व प्रशासनास तात्काळ कळवावी. तसेच याची दक्षता घ्यावी की सामाजिक अंतर, मास्क लावणे, सॅनीटायझरचा वापर करणे या गोष्टींची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी.
सदर कामामध्ये दिरंगाई, हलगर्जीपणा आढळून आल्यास सरपंचपद अपात्र करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल आणि तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्यावर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.’ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे ग्रामीण भागात कोरोना नियमांचे पालन होईल का, हे पाहावे लागेल. पालन न केल्यास कारवाई होणे गरजेचे आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.