नागपूर : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि सोबतच्या दोन कार्यकर्त्यांनीही हात धुवून घेतले होते. याप्रकरणी अमरावती न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंत्र्यालाच शिक्षा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालावर अद्याप ठाकूर यांची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप हाती आलेला नाही.
भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ठाकूर यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलिस कर्मचारीसुद्धा यामध्ये शिक्षेसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक वृद्धिंगत झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांवर हात उचलण्याचा आरोप सिद्ध झालेल्या मंत्री ठाकूर आता नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा देतील का?
अमरावती न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये पोलिस विभागातील कर्मचाऱ्याला न्याय मिळाला आहे. सत्तेची नशा उतरायला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. पण चढलेली ही नशा कधी ना कधी उतरतेच, याचे प्रत्यंत्तर न्यायालयाच्या आजच्या निकालावरुन आले आहे, असेही शिवराय कुळकर्णी यांनी सोशल मिडीयावर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.