दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला वाघ आणि सागाची तस्करी कारणीभूत...

मेळघाटात कार्य करणाऱ्या एनजीओंची ते येथे आले तेव्हा काहीही संपत्ती नव्हती. आता त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आदिवासींच्या जमिनी त्यांच्याकडे कशा आल्या, याचीही चौकशी झाली पाहिजे. मेळघाटातील गवळी समाजाच्या जमिनी वर्ग दोन करून विकल्या जाऊ शकतात.
Deepali Chavan - Prakash Ambedkar
Deepali Chavan - Prakash Ambedkar

अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येकडे अधिकाऱ्यांनी दिलेला त्रास याच बाजूने बघितले जात आहे. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास धारणी आणि मेळघाटातील वाघांची कमी झालेली संख्या व मध्य प्रदेशाच्‍या बाजूने होत असलेल्या साग तस्करीचे पाळेमुळे शोधून काढता येतील, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आज येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. 

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वाघ आणि सागाच्या तस्करीचा आरोप करून थेट वन विभागालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. धारणी व मेळघाट या संरक्षित वाघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या कमी होत आहे. याशिवाय मध्य प्रदेशाच्या सीमेकडून सागाची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. या दोन्ही घटनांचे संबंध दीपाली चव्हाणच्या आत्महत्येशी आहे. राज्य शासनाने सखोल चौकशी केल्यास सत्य जगापुढे येईल, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. 

दीपाली चव्हाणवर दोन वेळा ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. दोन्ही वेळा उच्च न्यायालयाने तिला जामीन दिला. या दोन्ही प्रकरणात तक्रार करणारे व गुन्हे दाखल करणारे यांची आर्थिक परिस्थिती काय आहे व त्यांचा वनविभागाशी संबंध आहे का, याचा खुलासा राज्य शासनाने करावा. राज्य शासन करीत नसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीच्या अमरावती येथील प्रा. निशा शेंडे याबाबत खुलासा करतील. त्यासाठी राज्य शासनाला आम्ही आठ दिवसांचा वेळ देत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, डॉ. प्रसन्नजीत गवई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

एनजीओंची चौकशी करा !
मेळघाटात कार्य करणाऱ्या एनजीओंची ते येथे आले तेव्हा काहीही संपत्ती नव्हती. आता त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आदिवासींच्या जमिनी त्यांच्याकडे कशा आल्या, याचीही चौकशी झाली पाहिजे. मेळघाटातील गवळी समाजाच्या जमिनी वर्ग दोन करून विकल्या जाऊ शकतात. मात्र, आदिवासीची जमीन राज्य शासनाच्या परवानगी शिवाय व लिलाव न करता विकता येत नाही. तरीही त्या कशा विकल्या गेल्या व एनजीओंकडे त्या कशा आल्या, याची चौकशी होणे आवश्यक असल्याच ॲड. आंबेडकर म्हणाले. 

दीपालीने कुणाच्या विरोधात चौकशीची मागणी केली होती?
दीपाली चव्हाणने अनेक पत्र वरिष्ठांना पाठवून कारवाईची मागणी केली होती. तिने कुणाच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी केली होती, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी करून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ॲड. आंबेडकर यांनी संशयाची सुई  माजी वनमंत्र्यांकडे फिरवली. 

रेड्डीवर गुन्हा दाखल करा
दीपाली आत्महत्या प्रकरणात रेड्डीला केवळ निलंबित करून चालणार नाही. त्याच्याविरुद्ध अबेटमेंटचा गुन्हा दाखल करून चौकशी केल्यासच बरेच सत्य बाहेर येईल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

महिला तक्रार निवारण समित्याच नाहीत
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण अमरावती जिल्ह्यात घडले असून, या जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आहेत. मात्र तरीही महिला तक्रार निवारण समित्याच अस्तित्वात नसून, महिला आयोगालाही अध्यक्ष नाही, असे  ॲड. आंबेडकर म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com