कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष विदर्भाचाच; आज दुपारी होणार अधिकृत घोषणा?

पक्षातील ज्येष्ठ आणि तरुणतुर्क नेत्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवावा लागतो. त्यासाठी राज्यभर बैठका, मेळावे आदी कार्यक्रम राबवावे लागतात. मंत्रिपद नसलेल्या प्रदेशाध्यक्षांना ही सर्कस करणे जड जाते.
Nana Patole- Vijay Wadettiwar
Nana Patole- Vijay Wadettiwar

नागपूर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण, या चर्चांनी जोर धरला. अजूनही कॉंग्रेसने हा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे पाच ते सहा नावांवर आजपर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतर शर्यतीत दोनच नावे राहिली. पण आज दुपारी सर्व चर्चांना विराम लागण्याची एक शक्यता वर्तविली जात आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी आज नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. 

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि राहुल गांधी यांचे निकटतम सहकारी राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष विदर्भाचाच होणार, हे निश्‍चित झाले. त्यामुळे पटोले, केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे चर्चेत राहिली. त्यानंतर केदार आणि यशोमती ठाकूर यांची नावे गळाली आणि पटोले आणि वडेट्टीवार ही दोनच नावे राहिली.

याबाबत कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चाही केली आहे. चर्चेनंतर नाना पटोले आणी विजय वडेट्टीवार ही दोनच नावे राहिली होती. ती आजही तशीच आहेत. तरी अजूनही नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावांवर दिल्लीत खल सुरू असल्याची माहिती आहे. पण शेतकरी नेते नाना पटोले यांच्या नावावर एकमत झाल्याचेही सूत्र सांगतात.

प्रदेशाध्यक्षांकडे हवे मंत्रिपद
नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी जवळपास निश्‍चित झाले आहे. प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी याबाबत राज्यातील आमदारांशीही चर्चा केली होती. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनाच कायम ठेवावा, असा एक सूर काही आमदारांनी लावला होता. तर प्रदेशाध्यक्ष कुणालाही करा पण त्यांच्याकडे मंत्रिपद असले पाहिजे, असे काहींचे म्हणणे पडले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी जर नानांची निवड नक्की झाली, तर त्यांना खाते कोणते द्यावे, याचाही विचार कॉंग्रेस पश्रश्रेष्ठींना करावा लागणार आहे. 

का हवे मंत्रिपद ?
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना राज्यभर फिरत राहावे लागते. संघटन वाढीसाठी सतत दौरे करावे लागतात. पक्षातील ज्येष्ठ आणि तरुणतुर्क नेत्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवावा लागतो. त्यासाठी राज्यभर बैठका, मेळावे आदी कार्यक्रम राबवावे लागतात. मंत्रिपद नसलेल्या प्रदेशाध्यक्षांना ही सर्कस करणे जड जाते. निधीची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागते. प्रदेशाध्यक्षांकडे मंत्रिपद असले तर ही कामे सहज होतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांकडे मंत्रिपद असावे, असेही काहींचे मत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com