घुग्घुस (जि. चंद्रपूर) : वेकोलिमध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे एकत्र आले. या दोघांनीही वेकोलिच्या पैनगंगा प्रकल्पावर धडक दिली. परप्रांतीयांना रोजगार देण्याच्या मुद्यावरून त्यांनी कंपन्यांचा चांगलाच ‘हिशेब’ घेतला आणि माती उत्खननाचे काम बंद पाडले. पण या दोघांच्या एकत्र येण्यामागे वेगळाच हेतू असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोघांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री आणि खासदारांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
परवा स्थानिकांना रोजगार देण्याच्या मुद्द्य़ावर जिल्ह्यात वेगळेच राजकीय सौख्य बघायला मिळाले. राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार या दोघांनी एकत्र येत वेकोलिच्या पैनगंगा प्रकल्पात धडक दिली. परप्रांतीयांना रोजगार देण्यावरून येथे माती उत्खनन करणाऱ्या कंपन्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आणि काम बंद पाडले. धोटे आणि जोरगेवार यांना उपस्थितीत केलेल्या अनेक बाबी खऱ्या निघाल्या. मात्र, त्यांचे अचानक एकत्र येऊन धडक देण्यामागे वेगळाच ‘हेतू’ आहे. यानिमित्ताने
आमदार धोटे आणि जोरगेवार यांचे फारसे सख्य नाही. जोरगेवार अपक्ष आमदार आहेत, तर धोटे कॉंग्रेसकडून निवडून आले. दोघांच्या मतदारसंघात 25 किलोमीटरचे अंतर आहे. परंतु वेकोलितील खासगी कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ते एकत्र आले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही प्रकल्पात 80 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचा नियम आहे. जिल्ह्यात काम करीत असलेल्या अनेक कंपन्यांकडून याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. अद्याप ही बाब पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या लक्षात आली नाही. मात्र, स्थानिकांचा हा विषय या आमदारांनी हाताळला. स्थानिकांच्या मागणीवरून धोटे आणि जोरगेवार विरूर (गाडेगाव) येथील वेकोलिच्या पैनगंगा प्रकल्पात पोहोचले. तिथे खाणीच्या भूपृष्ठावरील माती उत्खननाने काम महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. त्यांच्याकडील 147 कामगारांपैकी केवळ सात कामगार स्थानिक असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांची या दोघांनी चांगलीच कानउघाडणी केली.
महालक्ष्मी, गोलच्छा आणि इतर ट्रान्स्पोर्ट कंपन्यांना जोपर्यंत परप्रांतीय कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दोन्ही आमदारांनी तहसीलदार महेंद्र वाकलेकर आणि ठाणेदार गोपाल भारती यांना दिले. येत्या पंधरा दिवसात स्थानिकांना कामावर न घेतल्यास पुन्हा धडक देणार असल्याचा इशारा या दोघांनी दिला. काम मागण्यासाठी जाणाऱ्या स्थानिकांना हुसकावून लावण्यासाठी या कंपन्यांमध्ये गुंड पोसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.