नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ गत २१ फेब्रुवारीला होणार होता. दरम्यान कोरोनाचे संकट पुन्हा उद्भवल्याने डॉ. राऊत यांनी हा सोहळा पुढे ढकलला. यावर काल मुख्यमंत्र्यांनी काल जनतेला संबोधित करताना डॉ. राऊत यांचे तोंड भरून कौतुक केले.
मुलाच्या लग्नाचा काय आनंद असतो, हे बापच समजू शकतो. लग्न आणि त्यानंतर स्वागत समारंभ सर्व तयारी करताना आनंदाला अगदी उधाण आले असते. सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांची प्रतीक्षा असते. अशातच काही कारणाने समारंभ पुढे ढकलावा लागला किंवा रद्द करावा लागला, तर त्याचे दुःख निश्चितच होणार. कुणाल राऊत यांचा विवाह १९ फेब्रुवारीला झाला. स्वागत समारंभ २१ तारखेला होणार होता. दरम्यान राज्यावर कोरोनाचे संकट पुन्हा गडद झाले. राज्यातील स्थिती आणि सामाजिक भान जपत पालकमंत्री डॉ. राऊत यांनी क्षणाचाही विलंब न करता कुणाल यांचा स्वागत समारंभ पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
काहीच दिवसांपूर्वी डॉ. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना आणि केंद्रातील नेत्यांना लग्नाचे निमंत्रण दिले होते. मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना कोरोनाचे सर्व नियम पाळून समारंभ होणार असल्याचे सांगितले होते. कारण तेव्हासुद्धा कोरोनाचे संकट टळलेले नव्हते. पण स्थिती थोडीफार नियंत्रणात होती. पण दरम्यानच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली. अमरावती विभागात लॉकडाऊन करावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘मी जबाबदार’ म्हणत राज्यातील जनतेला आवाहन केले. त्यांच्या शब्दांना मान देत डॉ. राऊत यांनी एका दिवसात समारंभ रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर ‘याला म्हणतात सामाजिक जाणीव’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या नागपूर शहरात तसेच जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासोबतच संसर्ग वाढणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनासंदर्भातील नियमांची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी प्रशासनाने लागू करावी. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या “मी जबाबदार” या मोहिमेसोबतच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.