खुद्द पवारांनी पाहिले होते शेतीचे नुकसान, तरीही वर्षभरानंतर मिळाली भरपाई…

संबंधित तलाठ्याने मुनी यांना उद्धट उत्तरे देऊन परत पाठवले. शेतातील कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. शरद पवार दौऱ्यावर आले असताना नरखेड तालुक्यातील नुकसान त्यांना दाखवण्यासाठी सुदाम मुनी यांच्या शेताची निवड करण्यात आली होती.
Sharad Pawar - Sudam Muni
Sharad Pawar - Sudam Muni

नागपूर : २०१९ हे वर्ष सरत असताना परतीच्या पावसाने शेतीपिकांना चांगलाच दणका दिला. पिकांचे अतोनात नुकसान केले. शेतकरी हवालदिल झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्यातील शेतांमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती. त्यावेळी राजेंद्र धावडे उर्फ सुदाम मुनी यांच्या शेतात त्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर पवार येथून गेल्यानंतर जानेवारी २०२० मध्ये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांनी मिळणे सुरू झाले. त्या वर्षभरात मुनी यांना भरपाई मिळाली नाही, ती १ मार्च २०२१ ला ७ हजार रुपये मिळाले. पण २०१७-१८ ची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी सुदाम मुनी यांनी केला आहे.

२०१७-१८ मध्ये झालेल्या नुकसानासाठी १० हजार रुपये मिळायला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाई वाटपामध्ये कमीत कमी ९०० रुपये ते १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. राज्यपालांनी या मदतीची घोषणा केली होती. काटोल ते जलालखेडा मार्गावर बुधागड थांब्यापासून जवळच असलेल्या शेतात शरद पवार यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख आणि डझनभर नेते व अधिकारी होते. खुद्द पवारांनी नुकसानाची पाहणी केल्यानंतर तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा होती. पण ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’, या उक्तीप्रमाणे सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुनी यांना वर्षभर ताटकळत ठेवले. २०१७-१८ ची नुकसान भरपाई का दिली नाही, याचे समाधानकारक उत्तर आजही शासकीय कर्मचाऱ्यांनी दिले नाही. 

संबंधित तलाठ्याने मुनी यांना उद्धट उत्तरे देऊन परत पाठवले. शेतातील कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. शरद पवार दौऱ्यावर आले असताना नरखेड तालुक्यातील नुकसान त्यांना दाखवण्यासाठी सुदाम मुनी यांच्या शेताची निवड करण्यात आली होती. त्यानुसार पवारांचा ताफा तेथे पोहोचला. झालेल्या नुकसानाची पाहणी केली आणि तहसीलदारांना पंचनामा करण्याचे आदेश देऊन ताफा निघून गेला. त्यानंतर मुनी यांना मदत मिळण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागला. नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेसाठी बैठकांवर बैठका सुरू होत्या. तशाही स्थितीत शरद पवारांनी बैठका सोडून परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विदर्भाकडे कूच केली होती. शेतकऱ्यांच्या अडचणीला त्यांनी येवढे महत्व दिले होते. पण शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या अडचणींशी काही देणेघेणे नसल्याचे गेल्या वर्षभरातील त्यांच्या वर्तनावरून लक्षात येते, असे सुदाम मुनी म्हणाले.

'राजेंद्र धावडे उर्फ सुदाम मुनी हे शेतकरी मुनी आहेत. ते नेहमी फिरत राहतात. त्यांच्या बॅंक खात्याच्या संदर्भात घोळ झाला होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात २०१९-२० ची नुकसान भरपाईची रक्कम टाकायला बिलंब झाला. २०१७-१८ च्या नुकसान भरपाईसंदर्भातही तसेच झाले असावे आणि ती रक्कम परत गेली असावी. त्याची माहिती घेऊन कार्यवाही करू. 
- श्री जाधव, तहसीलदार, नरखेड. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com