नागपूर : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची गारपीट संपल्यानंतर राज्याचे माजी वनमंत्री आणि आमदार संजय राठोड या आठवड्यात मतदारसंघात सक्रिय झाले. कुठलाही कार्यक्रम करताना त्यांना पुन्हा कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विसर पडला की काय, अशी चर्चा त्यांच्याच मतदारसंघात आहे. काल दिग्रस शहरातील मोतीनगरमध्ये त्यांनी नगरपालिकेच्या योगा भवनाचे लोकार्पण केले. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. ४०० ते ५०० लोक तेथे एकत्र आले होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगची पार ऐसीतैसी झाली होती.
सद्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव कोठे असेल, तर तो दिग्रस शहर आणि तालुक्यात आहे. याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार राठोड करतात. सामान्य जनतेला जेथे रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळत्यास दंड ठोठावला जातो, कारवाई केली जाते. पण आमदार असलेल्या ठिकाणी शेकडो लोक जमतात, तर यांच्यावर कारवाई करणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरोनाच्या काळात सरकारने लावलेले निर्बंध केवळ सामान्यांनीच पाळायचे आणि लोकप्रतिनिधींना मात्र खुली सूट, असाच हा प्रकार आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर संजय राठोड १५ दिवस जनतेसमोर आले नव्हते आणि जेव्हा आले, तेव्हा त्यांनी वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे १० ते १५ हजारांपेक्षा जास्त गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाही त्यांच्यावर राज्यभरातून ताशेरे ओढण्यात आले होते.
मुख्यमंत्र्याचेही न ऐकणाऱ्या मंत्र्यावर आपत्ती निवारण कायद्यांनुसार कारवाई करण्याच्या मागणीने तेव्हा जोर धरला होता. त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. पोहरादेवीत जमवलेली गर्दी आमदार राठोडांना चांगलीच भोवली. ‘पुजा चव्हाण मृत्यू प्रकरण थंड होण्याची चिन्हे दिसू लागली होती, पण पोहरादेवीत शक्तिप्रदर्शन केल्यामुळे राठोड पुन्हा अडचणीत आले.’, असे तेव्हा बोलले जात होते. दिग्रसमध्ये काल सॅनिटायजर, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग कोठेही पाळण्यात आले नाही. कोविड नियमांचे उल्लंघन करून योगा भवनाचे लोकार्पण केल्याची बाब नागरिकांना रुचली नाही आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकारकडून ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ आणि ‘मी जबाबदार’, असे उपक्रम राहवून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असताना सत्ताधारी पक्षाचे एक आमदार बेजबाबदारपणे वागतात आणि तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे कायदे, नियम हे केवळ सामान्यांसाठी आहेत काय, या प्रश्नाचे उत्तर लोक मागत आहेत. उलटपक्षी लोकप्रतिनिधींनीच लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले पाहिजे. कोविड काळात सरकारने घालून दिलेले नियम पाळणे, कसे गरजेचे आहे, याबाबत लोकप्रतिनिधींनी जनजागृती केली पाहिजे. पण या प्रकरणात मात्र सर्व उलटेच सुरू असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.