राहुरी : राहुरी येथे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी कार्यशाळेचे उद्घाटन आज (रविवारी) राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रधान ऊर्जासचिव तथा सीएमडी (महापारेषण) दिनेश वाघमारे, प्रादेशिक संचालक (कोकण) प्रसाद रेशमे, संघटनेचे अध्यक्ष नागोराव मगर, सरचिटणीस जहिरोद्दीन सय्यद, मुख्य अभियंता (नाशिक) दीपक कुमठेकर, राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, माणिक गुट्टे, राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार आदी उपस्थित होते. Minister Prajakt Tanpure gave this good news to the youth ...
मंत्री तनपुरे म्हणाले, राज्य वीज मंडळाच्या महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनींच्या कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ. उच्चशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊ. विद्युत सहाय्यक पदाच्या रखडलेल्या भरती प्रक्रियेतील अडचणींवर मार्ग काढला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, असे तनपुरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, "विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दीड वर्षात स्वतःचा जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत ठेवला. त्यामुळे, राज्यात अंधार झाला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उर्जा राज्यमंत्री पदाची संधी दिली. त्यामुळे, वीज मंडळाच्या समस्या समजल्या. राज्य सरकारने कृषी विषयक ऊर्जा धोरण राबविल्याने, शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळाली. वीजबिल वसुलीतून नवीन रोहित्र, वीज उपकेंद्र देऊन, ऊर्जा विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यास मदत झाली."
"नगर जिल्ह्यात दहा ठिकाणी विज उपकेंद्रांची क्षमता वाढवणे व नवीन वीज उपकेंद्र निर्मितीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा होऊन ग्राहकांच्या तक्रारी दूर होतील. महावितरण कंपनीत कर्मचारी संख्या कमी असल्याने ग्राहकांना सेवा देण्यास मर्यादा येतात. कर्मचाऱ्यांवरील ताण हलका करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागेल. जेथे जास्त वसुली. तेथे मनुष्यबळ वाढविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.
"शेवटच्या ग्राहकांशी संवाद साधणारा कर्मचारी कंपनीचा चेहरा आहे. त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने मार्ग काढला जाईल. त्यांनी वीजबिल वसुली प्रसंगी ग्राहकांशी सौजन्याने संवाद साधावा. म्हणजे पोलिस संरक्षणाची गरज भासणार नाही. कर्मचार्यांच्या पाठीशी वीज कंपनी उभी राहिल." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.
संघटनेचे सरचिटणीस जहिरोद्दीन सय्यद यांनी वीज मंडळाच्या चार कंपन्या करून भांडवलदारांच्या घशात घालू नये. वीज कंपन्यांचे खासगीकरण करू नये. अशी मागणी करून, वीज कंपन्या सक्षम करण्यासाठी वीजबिल वसुली वाढविण्याची हमी दिली.
जम्मू-काश्मीर येथे उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधान ऊर्जासचिव तथा सीएमडी (महापारेषण) दिनेश वाघमारे; तसेच बाभळेश्वर येथील वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.