नगर : देशभरात कोरोनाचे संकट घोंगावत असताना गेल्या दोन दिवसांपासून श्रीरामपुरात वादळी वारा व अवकाळी पावसाने ३० तासाहून अधिक काळ लाईट गेली होती. त्यामुळे पिण्याचे पाणी सोडण्याची नगरपालिकेची मोठी पंचाईत झाली, त्यावेळी नगरसेविका स्नेहल खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी जारद्वारे फिल्टरचे पिण्याचे पाणी प्रभागातील तीनशे कुटुंबियांना घरपोच दिले.
कोरोनाच्या भितीमुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनानुसार घरात स्वतःला कोंडून घेतले. त्यात दोन दिवस विजेचा खेळखंडोबा झाल्याने उकाडा वाढला. संपूर्ण शहरात वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून कोलमडले होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यातच थत्ते मैदान जवळील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये असलेला पाणी साठा केतन खोरे यांनी अभियंता मनोज ईश्वरकुट्टी यांच्यासह जाऊन पाहणी करत पहिल्या टप्प्यातील निम्म्या प्रभागात वेळेवर पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन केले. परंतु विजेच्या लपंडावामुळे तिसऱ्या टप्प्यातील पूर्णवाद नगर, चराच्या पलीकडील नागरी वसाहत, इंद्रप्रस्थ सोसायटी, महादेव मळा परिसरातील २५० ते ३०० कुटुंबांना पिण्याच्या पाणी आले नाही.
नगरसेविका स्नेहल व केतन खोरे यांनी तातडीने थंड पिण्याचे पाण्याचे जार स्वखर्चाने उपलब्ध करत नागरिकांच्या घरी जाऊन दिले. प्रत्येक कुटुंबातील सदस्य संख्या विचारात घेऊन दिवसभर पुरेल इतके पाणी तर दिलेच शिवाय नगराध्यक्षा अनुराधा आदिकांशी चर्चा करून सायंकाळी थत्ते मैदान पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून तिसरा पाण्याचा टप्पाही लक्ष घालून पूर्ववत केला. या वेळी मोरया फाउंडेशनचे महादेव होवाळ, विजय पाटील, गणेश मोरगे, शुभम चोथवे, राजेश पाटील, राजेश थोरात, तेजस पाथरकर, दीपक निकम, रामा भोज, युसूफ पठाण, विजय भंडारी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी नियोजनरित्या प्रत्येक घरात पाणी वाटप केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.