नगर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पूर्वीही शेतकऱ्यांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आताही ते शेतकरी आंदोलनाला भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पाकिस्तान, चीन असे मुद्दे काढत आहेत, असे प्रतिपादन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.
तांबे आज पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की शेतकऱ्यांविषयी दानवे यांच्या बोलण्यातून सातत्याने शेतकरी विरोधी भावना व्यक्त होत आहे. याचा जाबविचारण्यासाठी दानवे यांच्या जालन्यातील घरासमोर उद्या (ता. 11) सकाळी 11 वाजता युवक कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार आहेत. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री व इतर मंत्री या आंदोलनावर बोलत नाहीत.
तृप्ती देसाईंना तो मुद्दा समजला नसेल
शिर्डी ग्रामस्थांचा मुद्दा रास्त होता. भाविकांनी कोणते कपडे घालावेत, याचे बंधन त्यांनी घातलेले नव्हते. केवळ अंगभर व शरीर प्रदर्शन होणार नाही, असे कपडे घालावेत, असे त्यांचे मत होते. भारतीय पारंपरिक कपडे परिधानांचे बंधन केलेले नव्हते. कदाचित तृप्ती देसाई यांना ग्रामस्थांचे म्हणणे समजले नसेल. म्हणून शिर्डी ग्रामस्थ, नगराध्यक्ष व देवस्थानला मी म्हणणे स्पष्ट करणारे निवेदन देण्याची विनंती केली आहे, असे तांबे यांनी सांगितले.