`माझी 5000 क्रमांकांची गाडी पहिल्यांदाच केडीसीसी बॅंकेकडे वळली....`

`विधानसभा निवडणुकीत केवळ 55 हजार मते मिळाली आहेत. आपण कुठे कमी पडलो, आपल्याला आणखी किती कामे करावी लागणार आहेत, याबाबत आत्मचिंतन करणार आहोत`
`माझी 5000 क्रमांकांची गाडी पहिल्यांदाच केडीसीसी बॅंकेकडे वळली....`

म्हाकवे : कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल मी आनंदाने स्वीकारतो. माझ्या पराभवाला कोणालाही दोष देत नाही. तसेच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो, की पराभवाचे खापर कोणावरही फोडू नये, कोणालाही दोष न देता शिवसेना मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागावे. अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्‍स हा कारखाना कार्यान्वित करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार संजय घाटगे यांना तिरंगी लढतींमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, याबाबत व्हनाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय घाटगे म्हणाले, ""कागलमध्ये तिरंगी लढत झाली, तर समरजित विजयी होतील, असा चुकीचा संदेश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांनी मला थांबायला सांगितले असते, तर मी पक्षप्रमुख उद्धवजींशी बोलून थांबलो असतो. मात्र, यामुळे महायुतीचेच नुकसान झाले. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत कै. सदाशिवराव मंडलिक आणि आपण एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यावेळी एक लाख 17 हजार मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत केवळ 55 हजार मते मिळाली आहेत. आपण कुठे कमी पडलो, आपल्याला आणखी किती कामे करावी लागणार आहेत, याबाबत आत्मचिंतन करणार आहोत. तसेच पहिल्यांदा आपला कारखाना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आता घाटगे गटाचे शिलेदार अंबरिशच...
आपण जाहीर केल्याप्रमाणे ही शेवटचीच निवडणूक होती. आता यापुढे आपल्या गटाचे शिल्लेदार अंबरिश घाटगे हे असतील. निःस्वार्थीपणे जसे माझ्यावर भरभरून प्रेम केले. तसाच जिव्हाळा अंबरिशवर राहू द्या. कार्यकर्त्यांनी एकसंध होत एकजुटीने कागल मतदारसंघात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे आवाहनही घाटगे यांनी केले.

म्हणून केडीसीसीची पायरी चढलो
जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखानदारांनी केडीसीसी बॅंकेची कर्जे घेतली आहेत. आपण राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते न मिळाल्यामुळे माझी 5000 क्रमांकांची गाडी पहिल्यांदाच केडीसीसी बॅंकेकडे वळली. कर्ज घेण्यासाठी बॅंक आपल्या दारात येत नाही. तर बॅंकेतच जावे लागते. शेतकरी आणि कार्यकर्त्यांची तीव्र भावना लक्षात घेऊन आपण केडीसीसी बॅंकेचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आमदार मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेण्याचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे घाटगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com