डॉ. शीतल आमटे या मानसिक ताण व नैराश्य चक्रात का अडकल्या?

लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला होत. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून केली होती. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटय़ावर आले होते.
Sheetal Amte
Sheetal Amte

चंद्रपूर : डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि कुटुंबीयांमध्ये कसलातरी वाद सुरू असल्याचे मागील काही घटनांमधून समोर आले होते. विविध चर्चांना उधाण आले होते. डॉ. विकास आमटेंवर त्यांचे सहकारी राहिलेल्या व्यक्तीने आरोपही केले होते. पण आज सकाळी ११ वाजता डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. या घटनेने अनेक प्रश्‍न जन्माला आले आहेत. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे - करजगी यांनी समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आमटे कुटुंबीयांनी निवेदन जारी करून शीतल आमटे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते. तसेच त्यांच्या आरोपांशी आमटे कुटुंबीय सहमत नसल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले होते. मात्र, हा वाद नेमका काय होता, की ज्यामुळे आज त्यांनी सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. 

समाजसेवक बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची उभारणी केली. संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना या ठिकाणी आश्रय मिळाला. बाबांनी त्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. मात्र, कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद्र किंवा रुग्णालय होऊ नये, याकडेही बाबांनी लक्ष दिले होते. त्यामधूनच त्यांनी कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी केली. त्यांच्याबरोबर साधना आमटे यांनी देखील कष्ट उपसले. दोघांच्या मेहनतीमधून आनंदवन दिमाखात उभे राहिले. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करून जगायला शिकविले, ते बाबा आणि साधना आमटे यांनीच. बाबांच्या निधनानंतर कारभार त्यांचे सुपुत्र विकास आमटे यांच्यावर सोपविला. त्यांनी काही काळ कारभार सांभाळल्यानंतर त्यांच्या मुलाची महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली. मात्र, आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलगी शीतल आमटे करजगी यांना समितीच्या विश्वस्त मंडळावर स्थान दिल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.  

बाबांच्या स्वप्नातून उभे राहिलेल्या आनंदवनातील अनेक उपक्रम नव्या पिढीच्या काळात बंद पडल्याचा आरोपही केला गेला.  कुष्ठरुग्णांनी स्वयंपूर्ण व्हावे म्हणून आनंदवनात अनेक उत्पादने तयार व्हायची. त्यांची तडाखेबंद विक्रीही होत असे. येथील ‘टीनकॅन’ प्रकल्पात तयार होणाऱ्या चाळण्या, गाळण्या आजही अनेकांच्या घरी असतील. आता हा प्रकल्प रखडत-रखडत सुरू आहे. आनंदवनाच्या सतरंज्या, चादरी, टॉवेल, बैठकीचे जाजम यालाही खूप मागणी असे. आता ही उत्पादने नाहीशी झाली आहेत, असेही बोलले जाते. कुष्ठरोग्यांच्याच हातून येथील वस्तू तयार व्हाव्यात, असा बाबांचा आग्रह होता. मात्र, त्याला कार्पोरेटचे स्वरूप देत असल्याचा आरोप नव्या पिढीवर करण्यात आला. याबाबत आनंदवनातील दोन कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. डॉ. विकास आमटेंच्या माजी साहाय्यकांनी पोलिसांत तक्रार देत गंभीर आरोप लावले होते. आम्हाला घर रिकामे करायला लावल्याचा आरोप तक्रारीत त्यांनी केला होता. तसेच बाबा आमटेंच्या सहकार्याच्या मुलाने देखील या वादात उडी घेत महारोगी सेवा समितीकडून कार्यकर्त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, आनंदवनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. 

दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आनंदवनामधील वाद, तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून, त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येऊ देऊ नये. आमटे कुटुंबीयांनी स्वत: पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.  केवळ राज्यच नाही तर देश-परदेशातून अनेकांनी आमटे कुटुंबातील हे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक दशकांपासून 'आनंदवन'शी जुळलेल्या राज्यातील अनेक कलावंतांनी आमटे कुटुंबाशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपुष्टात यावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. बाबा आमटे तसेच आनंदवनापासून प्रेरणा घेऊन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटेंना एक पत्र लिहून हे वाद मिटवावेत, अशी विनंती केली होती. 

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे- करजगी यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. हा व्हिडिओ दोन तासांतच माध्यमावरून हटविण्यात आला होता. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट केले होते. 

डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये, म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचे या चौघांनी म्हटले होते. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला होत. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून केली होती. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटय़ावर आले होते.
Edited By : Atul Meher

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com