
Maharashtra Politics : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी होत आहे. असे असतानाच आज खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलच राजकारण तापलं आहे.
संजय राऊतांना हक्कभंग समितीकडून लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. राऊत यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे विधीमंडळ म्हणजे चोर मंडळ, तिथे सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गट हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या चहापान बहिष्कारावरून त्यांना देशद्रोही संबोधले होते. यावरूनच अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना यासंदर्भातलं पत्र लिहलं आहे.
त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर हक्कभंग म्हणजे काय? आणि हक्कभंग सिद्ध झाल्यास काय शिक्षा होऊ शकते? हा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊ..
हक्कभंग कधी होतो? :
खासदार आणि आमदारांना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. याबरोबरच विधानसभेने एखाद्या विषयासंदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात.
या अधिकारांच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीला किंवा समुदायाला वक्तव्य किंवा वर्तन करता येत नाही. आमदार विधानसभेत जे विचार मांडतात, त्यावर इतर व्यक्तींना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही. अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.
हक्कभंग सिद्ध झाल्यास काय शिक्षा होऊ शकते?
विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो. अवमान करणारा व्यक्ती स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. तसेच तिर्हाईत व्यक्ती असेल तर तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा समज देऊन सोडून दिले जाऊ शकते.
हक्कभंग ही एक विशेष समिती असते. ही समिती हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावून घेऊ शकते. समितीने चौकशी केल्यानंतर समाधान झाल्यास त्या व्यक्तीला समज देऊन सोडून दिले जाऊ शकते. किंवा समिती शिक्षा देखील ठोठावू शकते.
यामध्ये समज देणे, ताकीद देणे, आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करुन तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.