
प्राची कुलकर्णी
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार असल्याने खूपच चुरस वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षिरित्या विजय मिळविल्याने या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
'जे 26चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल,' अशा शब्दात काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'कोण रनआऊट होऊ शकतो,' याबाबत भाष्य केलं. (Rohit Pawar latest news)
विधानपरिषदेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतील मतदानाचे समीकरण स्पष्ट केलं. "एखादी मॅच हरल्यावर त्यातून शिकावं लागलं. आता पीच ओळखीचे आहे, विरोधकही ओळखीचा आहे, त्यांची रणनीतीही ओळखीची झाली आहे. रन आऊट कोणी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. भाजपचे पाच उमेदवार आहेत, त्यापैकी दुसरा तिसराही रन आऊट होऊ शकतो," असे रोहित पवार म्हणाले. "थर्ड अंपायरने कितीही काही केलं तरी निकाल हा भाजपच्या बाजूनं लागणार नाही, याची काळजी घेतली आहे," असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी कॉग्रेसवर शिवसेना नाराज नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर टीका केली होती, ते व्हायला नको. पण त्यांची नाराजी दूर झाली आहे. निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, असे रोहित पवार म्हणाले. हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांमध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे, अजितदादा त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत, असे त्यांनी नमूद केलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.