
मुंबई - नवी मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक आज झाली. या बैठकीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर काय झाले, हा किस्सा ऐकविला. हे सांगताना त्यांनी आमच्या विरोधात षडयंत्र झाले त्याचाच फटका उद्धव ठाकरेंना बसला, असा टोलाही लगावला. ( 'There was a conspiracy against us and Uddhav Thackeray got hit' )
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अनेक जण विचारतात हे कसे घडले. मी त्यांना एवढेच सांगतो की, 'हे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा!' या ठिकाणी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेची इच्छा होती की, महाराष्ट्रात परिवर्तन झाले पाहिजे. नवीन सरकार आले पाहिजे. त्यांच्या मनातील संकल्पना. आज आपण पूर्ण केली आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मागील काही दिवसांचा घटनाक्रम पाहिला तर एक चमत्कार झाला आहे. सत्ता हे एक लोहचुंबक असतं. जे लोकांना एकत्रित ठेवतं. मात्र पहिल्यांदा महाराष्ट्रात असे झाले की, 50 आमदारांना ज्यात नऊ मंत्री आहेत. अशांनी सरकार सोडून विरोधी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लक्षात आले की, सरकार आहे कोठे? ज्या पद्धतीची वागणूक त्यांना मिळत होती, सरकार चालले होते. त्यांच्या लक्षात आले की हे सरकार पाच वर्षे असेच चालले तर पुढच्या निवडणुकीत आम्ही दिसणार नाही. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. मी एकनाथ शिंदेंचे अभिनंदन करेल. एक छत्रपतींचा मावळा, मर्द मराठा बाहेर पडला. या लोकांनी हिंदुह्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशी फारकत केली जात आहे. त्यामुळे हे सत्तेसाठी झालेले परिवर्तन नसून विचारांसाठी झालेले परिवर्तन आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ते केले, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
अनेकांना आश्चर्य वाटले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. हे अचानक घडले नव्हते. ठरवून घडले होते. आज ते एवढे मोठे लोक घेऊन येत असताना त्यांना नेतृत्त्व देणे हे महत्त्वाचे होतेच. शिवाय भाजप हे सत्तापिपासू नाही. मुख्यमंत्री आमचा होतो म्हणून सरकारे पाडणाऱ्यांत आम्ही नाही. आमच्याशी शिवसेनेने बेमानी केली. ती शिवसेना आता अल्पसंख्यांक झाली आहे. आणि खरी शिवसेना आपल्या बरोबर आहे. शिवसेना हा पक्ष नाही विचार आहे. त्यामुळे तो विचार जे जिवंत ठेवतील तीच खरी शिवसेना आहे. ते काम एकनाथ शिंदे करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
आम्ही त्यांना कोणताही शब्द दिला नव्हता. आमच्या विरोधात षंडयंत्र झालं. आमच्या जागा पाडण्यात आल्या. त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आधीच ठरले होते. नंबर गेम फसतो की नाही याच्याकडे त्यांची ते वाट पाहत होते. नंबरगेम जुळतो असल्याचे दिसताच ते म्हणाले आमचे सर्व मार्ग खुले आहेत. त्यानंतर त्यांना आमच्याशी चर्चा केली नाही. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचे ठरेल होते. आज जी परिस्थिती त्यांच्या पक्षावर आली त्याचे बीजारोपण त्या निर्णयात होते. आमच्या विरोधात षडयंत्र झाले त्याचाच फटका उद्धव ठाकरेंना बसला, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भाजपच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभारी सी.टी. रवी, सहप्रभारी जयभानसिंह पवैय्या, ओमप्रकाश ध्रुवे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मंगल प्रभात लोढा प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, संजय कुटे, उमा खापरे आदींसह भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.