
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे (Shivsena)आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरविले. त्यावर कांदे यांनी आपल्या मतदान हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा दावा कांदे यांनी केला आहे.
भाजपने मतदान प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी 13 जून रोजी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुहास कांदे यांनी अधिवक्ता अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
''निवडणूक आयोगाच्या आपण केलेल्या मताचा निकाल देण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध ठरवण्याची मागणी सुहास कांदे यांनी केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि धीरज सिंह यांच्या खंडपीठासमोर अजिंक्य उडाणे यांनी कांदे यांची बाजू मांडली. न्यायालयाने कांदे यांच्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी ठेवली आहे.
कांदे यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, 10 जून रोजी महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा त्यांनी निवडणूक सभागृहात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आणि आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. बॅलेट पेपरवर शिक्कामोर्तब करून नियमानुसार बाहेर पडून मतदानासाठी व्हीप बजावणारे शिवसेना नेते सुनील प्रभू यांना बॅलेट पेपर दाखवले.
कांदे यांनी आपली मतपत्रिका दुसऱ्या राजकीय पक्षाच्या व्हीपला दाखवल्याचा आरोप आमदार योगेश सागर यांनी केला. पण हे खरे नसून आपण आपली मतपत्रिका केवळ सुनील प्रभु यांनाच दाखवली इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्हीपला दाखवली नसल्याचे कांदे यांनी याचिकेत म्हटले आहे. निवडणूक सभागृहातून कांदे बाहेर पडल्यानंतर सागर यांनी हा आक्षेप घेतला असावा, असेही याचिकेत म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर मतदान केंद्राच्या प्रभारी निवडणूक अधिकाऱ्यांनीही आमदार सागर यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपण केलेले मत वैध असल्याचा निर्णय दिल्याचा दावाही सुहास कांदे यांनी आपल्या याचिकेत केला आहे. तरीही भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे हीच तक्रार केली आणि आपल्याला कोणतीही नोटीस न देता आणि कोणताही प्रतिसाद न मागता, निवडणूक अधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयाचा कोणताही विचार न करता आपले मत अवैध ठरवले,” असेही सुहास कांदे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.