मुंबई : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत वाहतुकदारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना कर्जफेडीसाठी डिसेंबरपर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात सावंत यांनी सीतारामन यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. वाहतुकदारांची संघटना असलेल्या शिवसेनाप्रणित शिववाहतूक सेनेतर्फे नुकतेच सावंत यांना वरील आशयाचे निवेदन देण्यात आले होते. त्यांच्यापैकी बहुतेकांनी वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी कर्जे काढूनच वाहने खरेदी केली होती. लॉकडाऊनपूर्वी त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरु होता, मात्र नंतर व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना घर चालविणेही कठीण झाले आहे. सुदैवाने रिझर्व्ह बँकेने ऑगस्टअखेरपर्यंत कर्जवसुलीला तहकूबी (मोरेटोरियम) दिल्याने त्यांना किंचितसा दिलासा मिळाला.
तो दिलासा आणखी काही काळ या वाहतुकदारांना मिळावा यासाठी त्यांच्या कर्जवसुलीला डिसेंबरपर्यंत तहकुबी मिळावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. सध्या केंद्र व राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तरीही अद्याप कोणाचेच व्यवसाय धडपणे सुरु झाले नसल्याने वाहतुकदारांनाही उत्पन्न मिळत नाही. यापुढेही अजून चार पाच महिनेतरी हेच चित्र कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून डिसेंबरपर्यंत कर्जांची वसुली करू नये, असे सावंत यांनी अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.