राजकीय गोळाबेरजेसाठी अनिल परब उतरले मैदानात; 'सप'च्या आमदाराची घेतली भेट

समाजवादी पक्षाच्या भूमिकेनंतर शिवसेनेकडून हालचाली
Anil Parab
Anil Parab Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा सामना आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारासमोर भाजपच्या उमेदवाराचे आव्हान आहे. यामुळं राजकीय गोळाबेरजेला गती आली आहे. यातच आता समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) नवीन तिढा निर्माण केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. (Rajya Sabha Election News Updates)

महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीला न जाण्याचा निर्णय अबू आझमी यांनी घेतला आहे. आझमी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. पण, आझमी यांनी फोनला उत्तर दिले नाही. भाजप नेत्यांकडूनही आझमी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर बोलताना आझमी म्हणाले की, शिवसेनेनं अडीच वर्षात आमच्यासाठी काय केलं. आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही.

यानंतर अनिल परब आणि रईस शेख यांची भेट झाली आहे. या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. यावर बोलताना रईस शेख म्हणाले की, अनिल परब हे माझे मित्र आहेत. त्यांनी आमची अनेक काम केली आहेत. पण, राज्यसभा निवडणुकीबाबत आमचा निर्णय अजून झालेला नाही. निवडणूक आहे म्हणून आमची भेट झालेली नाही. समाजवादी पक्षानं पाठवलेलं पत्र हे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत.

मी आणि अबू आझमी यांना कुणाचीही भीती नाही. आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जाणार नाहीत. शिवसेनेच्या विचारसरणीत बदल झाला असून, त्याची नोंद सरकारने घ्यावी. राज्यसभेला कसे मतदान करायचे हे आझमी ठरवतील. ते आमचे नेते आहेत. सरकार म्हणून एक विचारधारा असावी. अनिल परब यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. किमान समान कार्यक्रमात सर्वांना न्याय देण्याची भूमिका होती. अडीच वर्षात हज कमिटी का स्थापन केली नाही? सरकारने अडीच वर्षात अल्पसंख्यांकांसाठी काय काम केले? हे आम्ही विचारत आहोत. भाजपचा कुठलाही संपर्क झालेला नाही. आझमी हे उद्या कर्नाटकातील बिदरला जाणार आहेत. ते 10 जूनला सकाळी मुंबईत दाखल होतील, असे शेख यांनी सांगितले.

Anil Parab
समाजवादी पक्षानं खिंडीत गाठलं! अबू आझमींकडून शिवसेनेची कोंडी

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सहजपणे जिंकता येणं शक्यत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक तर मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळं शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात आलं आहे.

Anil Parab
शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं काय होणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनला विधान भवनात मतदान होईल. त्यापूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व आमदार १० जूनपर्यंत तेथे असतील. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होऊ शकते, ही शक्यता गृहित धरुन शिवसेनेनं ही रणनीती आखली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com