फुटीरांना आता शांत झोप लागेल, ED त्यांच्या दारात जाणार नाही ; राऊतांचा टोला

Sanjay raut |आमचीच शिवसेना खरी. आम्ही शिवसेना सोडली नाही ! त्यांची ही भूमिका कातडी वाचविण्याची आहे.
MP Sanjay raut
MP Sanjay rautSarkarnama

पुणे : "आमचीच शिवसेना खरी" या मुद्यांवरुन सध्या राजकारण तापलं आहे. शिवसेना, शिंदे गट यांच्यात युक्तीवाद सुरु आहे. दोघामध्ये शाब्दीक युद्ध रंगले आहे. या विषयावरुन शिवसेनेचे (shiv sena) नेते, खासदार संजय राऊत यांनी 'सामना'तून आपल्या 'रोखठोक'मधून एकनाथ शिंदे गटावर (eknath Shinde)टीकास्त्र सोडलं आहे. (Sanjay raut latest news)

"महाराष्ट्राच्या विधानसभेतील जे सदस्य शिवसेनेतून बाहेर पडले त्यांचा युक्तिवाद एकच आहे तो म्हणजे, आमचीच शिवसेना खरी. आम्ही शिवसेना सोडली नाही ! त्यांची ही भूमिका कातडी वाचविण्याची आहे, अशी टीका संजय राऊतांनी 'रोखठोक'मधून केली आहे.

हिंदुस्थानातील लोकशाहीचे भवितव्य कसे अंधकारमय झाले आहे त्याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. देशाचे सरन्यायाधीश श्री. रमण्णा यांनी जयपूरमधील एका कार्यक्रमात लोकशाही व संसदेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली. विरोधी पक्षांची जागाही सत्ताधाऱ्यांनी बळकावयाची हे चित्र घातक आहे, असे सरन्यायाधीश रमण्णा जेव्हा जाहीरपणे सांगतात तेव्हा भीती वाटू लागते. पण एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे कितीही तांडव झाले तरी लोकशाही या देशात मरणार नाही, असे राऊतांनी म्हटलं आहे.

MP Sanjay raut
Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

'रोखठोक'मध्ये संजय राऊत म्हणतात..

  • घटना ही शेवटी माणसांसाठी असते. माणसे घटनेसाठी नसतात. घटनेतील 10 व्या शेडय़ुलनुसार 16 फुटीर आमदार सरळ अपात्र ठरतील.

  • सरकारला वाचविण्यासाठी व शिवसेनेला कायमचे संपवून टाकण्यासाठी 16 अपात्र आमदारांना पेंद्र सरकारात बसलेले लोक वाचवीत आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काय निर्णय घेते यावर आता देशाचे व लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे.

  • महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त केली हे केंद्रातील राज्यकर्ते मानायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. त्याचा बदला शेवटी शिवसेना फोडून घेतला गेला.

  • तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील. सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडू लागल्या आहेत.

  • शिवसेनेतील फुटीर आमदार-खासदारांना सर्व जाचांतून मुक्त केले. आता त्यांना शांत झोप लागेल. ईडी, सीबीआय त्यांच्या दारात जाणार नाही.

  • समान न्यायाचे तत्त्व किती चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे ते स्पष्ट दिसते. भारतीय लोकशाही जिवंत आहे, पण ती कुणाची तरी आज बटीक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com