राऊतांचं उपराष्ट्रपतींना चार पानी पत्र अन् त्यावर आदित्य ठाकरेंकडून एकच शब्द...

सरकार पाडण्यासाठीचा दबाव झुगारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut, Aditya Thackeray
Sanjay Raut, Aditya ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सत्यमेव जयते' म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना लिहिलेलं पत्र बुधवारी सकाळी ट्विट केलं. या पत्रात राऊत यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. सरकार पाडण्यासाठीचा दबाव झुगारल्याने ईडी (ED) मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या निकटवर्तींवर ईडीच्या धाडी पडत असून एकाला अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर राऊत चांगलेच संतापले असून त्यांनी थेट व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले आहे. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असा दावा राऊत यांनी पत्रात केला आहे.

Sanjay Raut, Aditya Thackeray
नितेश राणेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

या पत्राच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी केवळ एकाच शब्दांत उत्तर दिलं. राऊतांचं पत्रच बोलकं असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात. असेही राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी

आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे. 2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com