
Shiv Sena News : शिवसेना फोडणे हे भाजपचे (bjp) मिशन होते, असे विधान भाजपचे नेते, आरोग्यमंत्री गिरीश महाजन (mla girish mahajan) यांनी नुकतेच केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महाजन यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. महाजन यांनी दिलेल्या माहितीबाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांचे आभार मानले. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात याबाबत भाष्य केले आहे.
"गिरीश महाजन यांनी चाळीस खोकेबाज आमदारांचे बिंगच फोडले व तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर. गिरीश महाजन हे ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा संदर्भ द्यायला विसरले. वास्तविक, सत्तांतराच्या या ‘ऑपरेशन’ व ‘मिशन’मध्ये या दोन्ही संस्थांचा सहभाग मोठा होता व त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय भाजपचे मिशन पूर्ण झाले नसते. कोणत्या आमदाराचे काय प्रकरण आहे व त्याच्या मागे कोणती यंत्रणा लावून त्याच्या गळय़ाभोवती फास आवळायचा हे या मिशनचे एक धोरण होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक आमदारांची त्यामुळे कायमची झोप उडाली व त्यांना निद्रानाशाचा विकार जडला," असा टोला अग्रलेखात लगावला आहे.
राज्यात सत्तातर झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सौदेबाजी केली होती, असा आरोप करण्यात येतो. या घटनेचा समाचार शिवसेनेचे घेतला आहे. "शिवसेना फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रात्रीच्या अंधारात वेश पालटून बाहेर पडत व शिवसेनेच्या फुटीर आमदारांना भेटून सौदेबाजी करीत. फडणवीस यांच्या या ‘हरुन अल रशीद’ प्रकरणाचा गौप्यस्फोट खुद्द अमृता फडणवीस यांनीच केला. व्यवहार, देणेघेणे वगैरे पक्के झाल्यावर फुटीचा दिवस ठरला. शिवसेनेच्या फुटीनंतर देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला, असे शिवसेनेने म्हटलं आहे.
"महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले," असा आरोप अग्रलेखात करण्यात आला. "महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले व त्या गंगेचे पाणी जामनेरमधून आले हे खरे नाही काय? भाजपचे मिशन हे असेच आहे. त्याने गंगा साफ मैली करून टाकली. मोदी तरी काय करणार," असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
शिवसेना फोडणे हे भाजपचे ‘मिशन’ होते व ते पूर्ण झाल्याचा आनंद गिरीश महाजन यांनी नुकताच व्यक्त केला. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते; पण आम्ही तो फोडला, असेही महाजन म्हणाले. जळगावात ज्या व्यासपीठावर महाजन यांनी हे सत्यकथन केले त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. महाजन यांच्या वक्तव्यावर शिंदे यांनी टाळय़ा वाजवल्या व खुशीने दाढीवर हात फिरवला. शिंदे यांनी एक प्रकारे महाजन यांच्या विधानाचे समर्थन केले. महाजन यांनी चाळीस खोकेबाज आमदारांचे बिंगच फोडले.
‘महाराष्ट्रातील सत्तांतर सहज घडले नाही व त्यामागे भाजपचे कठोर परिश्रम होते. अखेर मिशन यशस्वी झाले,’ असे गिरीश महाजन म्हणाले. गिरीश महाजन यांच्या बोलण्यातून महाराष्ट्राच्या जनतेस काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. पहिले म्हणजे, शिवसेनेतून जे चाळीसेक लोक फुटले ते कोणत्याही उदात्त हेतूने फुटले नाहीत. म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व सोडले वगैरे सांगून जे आपल्या बेइमानीचे समर्थन करीत आहेत ती बकवास आहे. येथे हिंदुत्व वगैरे गोष्टीचा काहीच संबंध नाही, हे गिरीश महाजन यांनीच स्पष्ट केले. दुसरा मुद्दा म्हणजे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फुटली. शरद पवार यांनी कारस्थान करून शिवसेना फोडली असे बेइमान गटाचे आमदार बोलत होते. त्याची हवाच गिरीश महाजन यांनी काढली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.